पाथर्डी – परळी माझी आई तर पाथर्डी माझी मावशी आहे. विकास कामे करताना जेवढा निधी परळीला दिला, तेवढाच पाथर्डीला दिला. यातही काही कमी पडले असेल तर महाराष्ट्रात तुमच्याच लेकीचे सरकार येणार आहे. त्यासाठी मोनिका राजळेंना माझ्याबरोबर विधानसभेत पाठवा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे पाथर्डी येथे बोलतांना केले.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ पाथर्डी येथे झालेल्या सभेत समोर ना.मुंडे बोलत होत्या.
यावेळी खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, आमदार शिवाजीराव कर्डिले, माजीमंत्री दिलीप गांधी, नितीन काकडे, अभय आव्हाड, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, अमोल गर्जे, सोमनाथ खेडकर, रामनाथ राजपुरे, बाळासाहेब सोनवणे, तुषार वैद्य, वाय. डी. कोल्हे, भीमराव फुंदे, धनंजय बडे, गोकुळ दौंड, प्रविण राजगुरु, नंदकुमार शेळके, मोहनराव पालवे, अरुण मुंडे उपस्थित होते. मुंडे म्हणाल्या, आईपेक्षा मावशीची माया थोडी जास्त असते. त्याप्रमाणे पाथर्डीच्या लोकांचे प्रेम माझ्यावर अधिक आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांचे स्वर्गीय मुंडे यांच्यांवर प्रेम आहे. निस्वार्थ आणि निस्पृह भावना ठेवून आमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना संभाळण्यासाठी मी समर्थ आहे.
कुणाकडे जाण्याची त्यांना गरज नाही. लोकशाहीमध्ये अशी विश्वासाने साथ देणाऱ्या लोकांची वोवाळणी करायला हवी. मोनिकाताई एक जबाबदारी तुम्हाला देते. पाथर्डीचे लोक माझा जीव आहेत. माझा जीव तुमच्याकडे गहाण ठेवला आहे. तुम्ही माझ्या जीवाला जपा. त्यांना संपत्ती नको, प्रेम पाहिजे सन्मान पाहिजे. हे तुम्ही करा मला खात्री आहे. परळीला माझी काळजी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. मोनिकाताई तुमची काळजी करण्यासाठी मी येथे आले आहे. स्वर्गीय मुंडे यांचा आशीर्वाद आपल्याबरोबर आहे. देशात भाजपचे पंतप्रधान, राज्यात मुख्यमंत्री भाजपचे, जिल्ह्यात खासदार भाजपचे आहेत. त्यामुळे आपल्या मतदारसंघातही भाजपच्या आमदाराला आपल्याला निवडून द्यायचे आहे.
मुंडे म्हणाल्या, राष्ट्रवादी म्हणजे बुडते जहाज आहे. नुसत्या जातीपातीच्या राजकारणापलीकडे यांनी काहीही केले नाही. त्यामुळे अशा लोकांच्या पाठीशी जाण्याची काहीच कारण नाही. लोकसभा निवडणुकीला डॉ. सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी प्रचार सभा घेऊन विजयाचा शिक्कामोर्तब आपण केला होता. यावेळीही ही मोनिकाताई यांचा विजय निश्चित आहे. मोनिकाताईंचा विजय म्हणजे माझा विजय असल्याने तुम्ही सर्वांनी त्यांच्यामागे भक्कम उभे राहावे, असे आवाहन ना. मुंडे यांनी केले. सूत्रसंचालन पंचायत समिती सदस्य सुभाष केकान यांनी केले तर माणिक खेडकर यांनी आभार मानले.