पिंपरी – वडगाव मावळ येथील ऐतिहासिक तळ्यालगत दर गुरुवारी ग्रामदैवत पोटोबा मंदिर प्रांगण आणि परिसरात आठवडे बाजार भरतो. भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी सोय म्हणून नगरपंचायतकडून भाजी मंडईमध्ये कठडे बांधले आहेत. मात्र काही कठडे खचल्याने भाजी विक्रेत्यांकडून जीव धोक्यात घालून भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू आहे. हे तुटलेले कठडे धोकादायक बनले असून, भाजीविक्रेते या कठड्यांसह तलावात कोसळण्याची दाट शक्यता आहे.
वडगाव हे मावळ तालुक्याचे मुख्यालय आहे. याठिकीां पंचायत समिती, न्यायालय, इतर महत्वाची शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे वडगावात तालुक्यातील नागरिकांचा कायम राबता असतो. वडगावचे ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिर परिसरात प्रत्येक गुरुवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारात तालुक्यासह इतर ठिकाणांवरून शेतकरी, विक्रेते भाजी विक्रीसाठी येतात. याच बाजारात भाजी विक्रेत्यांसह मासळी बाजारही भरतो. मसाले व्यावसायिक, गृहोपयोगी वस्तू विक्रेते देखील बसतात. गुरुवार हा मुख्य दिवस असला तरी बुधवारपासूनच बाजारात नागरिकांची गर्दी असते.
पोटोबा मंदिराच्या बाजूला असलेले ऐतिहासिक तळे आणि रेल्वे स्टेशन यांच्या मधल्या जागेत भाजी मंडई तयार करण्यात आली आहे. भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी नगरपंचायतकडून कठडे बांधून दिले आहेत. विक्रेते आणि ग्राहक यांच्या सोयीसाठी भाजी मंडई सुरु केली असली तरी भाजी मंडई अडचणींच्या गर्तेत अडकली आहे. ऐतिहासिक तळे आणि भाजी मंडई यांच्या मध्ये असलेली भिंत पडली असून मंडईचा कठडा खचला आहे. यामुळे मंडईतील कठड्याला भलेमोठे भगदाड पडले आहे.
जागेअभावी तुटलेल्या कठड्यावर बसून भाजी विक्रेते भाजी विक्री करत असतात. अचानक उर्वरित कठडा खचण्याची दाट शक्यता आहे. बाजाराच्या दिवशी ही घटना घडली तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. भाजी मंडईला निवारा नाही. त्यामुळे पावसाळ्यात विक्रेते ताडपत्री झाकून घेतात. तरीही ग्राहक पावसात भिजतात. मंडईकडून केशवनगरकडे जाणाऱ्या मार्गावर चिखल होतो. तसेच जवळून वाहणाऱ्या नाल्यामुळे संपूर्ण मंडईत दुर्गंधी पसरते. दुर्गंधी, अस्वच्छता, कठड्याचा धोका, पावसाळ्यातील गैरसोय अशा विविध अडचणींच्या गर्तेत वडगाव मावळचा आठवडे बाजार अडकला आहे.
नगरपंचायतकडून आठवडे बाजारातील विक्रेत्यांकडून शुल्क आकारले जाते. मात्र,तरीदेखील विक्रेत्यांना मूलभूत सोयी पुरवल्या जात नाहीत. तसेच ग्राहकांची देखील गैरसोय होत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.
पावसाळ्यात प्रत्येक गुरुवारी चिखल तुडवत भाजी खरेदीसाठी जावे लागते. अचानक पाऊस आल्यास गैरसोय होते. मंडईतील कठडा खचला आहे. हे चित्र मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. प्रशासनाकडून याची कुठलीही दखल घेतली जात नाही. भाजी मंडईत स्वच्छता राखण्यासाठी निवारा शेड बांधणे आवश्यक आहे.
– रुक्मिणी डोंगरे, गृहिणी