आगरकर, प्रसाद, शिवरामकृष्णन व चौहान यांच्यात चुरस
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य निवड समितीच्या प्रमुखपदासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अर्ज मागवले होते. या पदासाठी इच्छुक उमेदवारांपैकी चार खेळाडूंना शॉटलिस्ट केले आहे. त्यात माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर, वेंकटेश प्रसाद, लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि राजेश चौहान यांचा समावेश आहे.
निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद आणि सदस्य गगन खोडा यांची मुदत संपली असून आता समितीतील दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. बीसीसीआयकडे एकूण 17 खेळाडूंचे अर्ज आले होते, त्यातून आगरकर, प्रसाद, शिवरामकृष्णन आणि चौहान यांची नावे क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) मंडळाकडे पाठविली आहेत.
त्यांच्या मुलाखती सीएसी घेणार आहे. सीएसीमध्ये मदनलाल, रुद्रप्रताप सिंग आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश आहे. या महिना अखेरीस मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे व नव्या अध्यक्षाचे नाव जाहीर करण्यात येईल. नव्या अध्यक्षाला आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करावी लागणार आहे. ही मालिका 12 मार्चपासून सुरू होईल.