नवी दिल्ली – नॅशनल हेराल्ड प्रकरणात 751 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईवर राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी जोरदार आक्षेप घेतला असून त्यांनी म्हटले आहे की, वकिलांच्या पॅनेलने केलेल्या सुचनेनुसार ईडीने ही कारवाई केली आहे. तथापि कंपनीचे भागधारक हे कंपनीच्या मालमत्तेचे मालक नसतात त्यामुळे भागधारक हेच मालक आहेत असे समजून केलेली ही कारवाई चुकीची आहे असेहीं सिब्बल यांचे म्हणणे आहे.
सिब्बल म्हणाले की, ईडीने कायदा काय म्हणतो हे जाणून घेतले पाहिजे. मालमत्ता कंपन्यांच्या मालकीच्या आहेत. यंग इंडियाने एजेएल म्हणजेच असोएिटेड जर्नल्स लिमीटेड या कंपनीचे 99 टक्के शेअर्स ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. पण मुळात कंपनी मालमत्ता कायद्यानुसार शेअरहोल्डर्स हा कंपनीचा मालक नसतो.
त्यामुळे चुकीचे गुन्हे दाखल करून ही मालमत्ता जप्त करणे चुकीचे आहे. आणि मुळात यंग इंडिया आणि असोएिटेड जर्नल्स या दोन्ही संस्थांचा या संबंधात एकमेकांवर कोणताहीं दावा नाहीं किंवा आरोपही नाहीं त्यामुळे कोणाच्या विश्वासाच भंग झाला असा सवालही सिब्बल यांनी केला आहे.
कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनीही अंमलबजावणी संचालनालयाकडून एजेएलच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्याच्या कृत्याचा निषेध करीत पाच राज्यांतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारला आपल्या एजन्सीचा गैरवापर करणे भाग पडते आहे असा आरोप केला. नॅशनल हेराल्ड हा स्वातंत्र्य चळवळीचा आवाज होता.
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला स्वातंत्र्य चळवळीतील या वृत्तपत्राच्या भूमिकेचा अभिमान आहे, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस नेते केसी वेणुगोपाल राव यांनीही म्हटले आहे की हे हे प्रकरण खोटेपणाने तयार केले गेले आहे आणि त्यातून भाजपने लज्जास्पद सूडाचे राजकारण प्रदर्शित केले आहे.