ICC Introduces New Rule In T20I & ODI Cricket : ICC ने क्रिकेटच्या नियम पुस्तकात आणखी एक नियम जोडला आहे. पांढऱ्या चेंडूने खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या दोन फॉरमॅटला (ODI आणि T20) गती मिळावी या उद्देशाने हा नियम आणण्यात आला आहे.
याअंतर्गत टी-20 किंवा वनडेमधील डावात गोलंदाजी करत असलेल्या संघाने षटक टाकण्यास एक मिनिटापेक्षा जास्त विलंब लावल्यास फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 अतिरिक्त धावा दिल्या जातील. अर्थात हा पाच धावांचा दंड जर गोलंदाजी करत असलेल्या संघाने तीनवेळा पुढील षटक टाकण्यासाठी 60 सेकंदांपेक्षा जास्त वेळ घेतला तरच लावला जाणार असल्याचेही आयसीसीने म्हटले आहे. यासाठी स्टॉपवॉचचा वापर केला जाणार आहे. हा नियम लागू झाल्यानंतर कर्णधार आणि गोलंदाजांना प्रत्येक वेळी रणनीती तसेच घड्याळावर लक्ष ठेवावे लागणार आहे.
हा नवा नियम सध्या फक्त पुरुष क्रिकेटमध्ये लागू असेल. चाचणी पूर्ण झाल्यानंतर निकालांचे विश्लेषण करून हा नियम कायम केला जाईल आणि त्यानंतर महिला क्रिकेटमध्येही तो लागू केला जाऊ शकतो. ही चाचणी डिसेंबर 2023 ते एप्रिल 2024 पर्यंत चालणार आहे. या नियमामुळे सामन्यांचा वेग कमी होणार नाही आणि प्रेक्षकांची उत्सुकता कायम राहील, असा विश्वास आहे. अनेक वेळा एकदिवसीय सामने 8 तासांची मर्यादा ओलांडतात. अशा स्थितीत खेळाचा वेग मंदावतोच, शिवाय ब्रॉडकास्टरचेही नुकसान होण्याची शक्यता असते.
आयसीसीच्या बैठकीत घेतला जाणार निर्णय…
एकदिवसीय तसेच टी-20 सामन्यांसाठी वेळेत षटके पूर्ण करण्यासाठी आयसीसीने हा नवा प्रयोग अंमलात आणण्याचे जाहीर केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Changes to T20I Playing Conditions come into effect https://t.co/RevgbZWOAl via @ICC
— ICC Media (@ICCMediaComms) January 7, 2022
आयसीसीने म्हटले आहे की, गोलंदाज संघाने मागील षटक पूर्ण झाल्यानंतर 60 सेकंदात पुढील षटक टाकण्यास सुरुवात केली नाही आणि डावा दरम्यान दोनदा असे केल्यास कोणताही दंड नाही, परंतु तिसऱ्यांदा असे झाल्यास गोलंदाजी करणाऱ्या संघास त्याच्यावर 5 धावांचा दंड आकारला जाईल. म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावसंख्येमध्ये 5 धावांची भर पडेल.