प्रशासनाचे दुर्लक्ष : सुरक्षा उपकरणांविना करताहेत कामे
पिंपळे निलख – पिंपरी-चिंचवड शहरात महावितरण विभाग वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सतत रोहित्राचे होणारे स्फोट, विजेचा लपंडाव, अथवा रोहित्रांच्या देखभालीकडे होणारे दुर्लक्ष असे अनेक प्रश्नाने वादाच्या भोवऱ्यात सापडलेला महावितरण विभाग पुन्हा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा करताना दिसून आला आहे. त्यामुळे महावितरणला कधी शहनपण येणारा असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. सध्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा राम भरोसे असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महावितरणचे कर्मचारी काम करताना पुरेशी सुरक्षा साधने वापरताना दिसून येत नाहीत. बहुतांश वेळा सुरक्षा साधनांविनाच काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जमिनीपासून तीस ते चाळीस फुट उंचीवर जाऊन वीजपुरवठा सुरळीत करणे अथवा रोहित्रांची दुरुस्ती करण्याचे काम महावितरण कर्मचारी करत असतात. परंतु हे काम करताना सुरक्षा यंत्रणा व साधनांचा वापर न करता कर्मचाऱ्यांच्या जिवाशी खेळ करत महावितरण विभागाचे काम सुरू असल्याचे पिंपळे निलख, दापोडी, सांगवी परिसरात दिसून येत आहे. महावितरण विभाग अत्यावश्यक सेवा देत असताना आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या महिन्यात भोसरी व नवी सांगवी येथे सुरक्षा साधनांअभावी महावितरण कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला होता. नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेचा विसर संबंधित विभागास पडल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचप्रमाणे एखादी भीषण घटना पुन्हा घडल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न निर्माण होत आहे. सेवा देणारे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत असले तरी ते व संबंधित अधिकारी याबाबत कोणत्याही प्रकारची सुरक्षा व काळजी घेत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सुविधांची वानवा
विद्युत रोहित्राची दुरस्ती अथवा खांबावर चढून विजेच्या तारा अथवा इतर दुरुस्ती करत असताना कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा साधने देणे गरजेचे आहे. परंतु याकडे महावितरण विभाग, ठेकेदार लक्ष देत नाही. त्यामुळे विद्युत खांबांवर उंच ठिकाणी उभे राहून कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. सुरक्षा बेल्ट, हेल्मेट, विजेचा शॉक लागू नये यासाठी हॅंडग्लोज पुरविणे अपेक्षित असते. परंतु महावितरण व ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत असल्याने नवी सांगवी येथील मुख्य रस्त्यावर विद्युत खांबावर चढून काम करताना दिसून आले. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.