मुंबई – मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. परंतु भाजप आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. नुकतीच मुंबईत भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेवर निशाणा साधला. सोबतच मुंबई महापालिकेवर शुद्ध भगवा फडकवणारच असा निर्धार व्यक्त केला.
यातच या विधानावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असं म्हणत भाजपवर हल्ला बोल केला आहे.
काय म्हणाले जयंत पाटील
मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न पाहू नये. त्यांचं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही.