– मेघश्री दळवी
एक काळ असा होता की रोबॉट म्हटलं की डोळ्यासमोर चटकन कारखान्यातली अजस्र धुडं डोळ्यासमोर यायची. आता मात्र वैद्यकशास्त्रात आणि सेवा उद्योगात रोबॉट्सचा संचार वाढतो आहे. आणखी एका क्षेत्रात यापुढे रोबॉट्सचा अधिक सहभाग दिसेल, आणि ते क्षेत्र आहे शेती.
शेतकामात शारीरिक श्रमाचा वाटा जास्त आहे. त्यामुळे रोबॉट्स वापरून तिथे माणसांवरचा भार निश्चितच हलका करता येईल. जमिनीची मशागत, पेरणी, कापणी यासाठी प्रगत देशांमध्ये रोबॉट्सचा वापर सुरू आहे. वेग प्रचंड असल्याने मोठमोठ्या शेतांमध्ये रोबॉट्स पटापट कामाचा फडशा पाडू शकतात. काही धान्याच्या पेरणी किंवा कापणीसाठी मोजकाच वेळ हाताशी असतो. अशा वेळी रोबॉट्सचा कामाचा झपाटा खूप सोयीचा ठरतो.
तण ओळखून उपटणे, कीटकनाशकांचा योग्य त्या प्रमाणातच फवारा देणे अशा गोष्टींमध्ये नेमकी नजर आवश्यक असते. रोबॉट्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून त्यांच्याकडून ही कामं करून घेता येतात. वाइन उद्योगात द्राक्षं नेमक्या वेळी खुडण्यासाठी किंवा चहाच्या मळ्यात चहाची कोवळी पानं लवकरात लवकर खुडण्यासाठी रोबॉट्सचा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो.
बिग डेटा आणि डेटा विश्लेषण करणाऱ्या बुद्धिमान यंत्रणाही शेतीची कार्यक्षमता वाढवतात. हवामान, जमिनीचा कस, त्यातली आर्द्रता या सगळ्यांची माहिती घेऊन त्यावरून योग्य पिकाची निवड, त्याचं योग्य व्यवस्थापन, आणि अर्थात त्याच्या पूर्ण नोंदी यात या यंत्रणा माणसाच्या कितीतरी पट योगदान देऊ शकतात.
शेतीतल्या रोबॉट्सची जागतिक बाजारपेठ 2025 पर्यंत वीस अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या पुढे जाईल असा अंदाज आहे. त्यात सेल्फ-ड्रायव्हिंग ट्रॅक्टर्स, फवारणी करणारे ड्रोन्स, कापणी करणारी स्मार्ट यंत्रणा अशा अनेक प्रकारच्या साधनांचा समावेश आहे. युरोपियन देश आणि जपानमध्ये शेतीत काम करायला पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध नाही. प्रगत देशांमध्ये एकूण लोकसंख्येतली जेमतेम चार ते दहा टक्के सक्षम माणसं या क्षेत्रात असल्याने यंत्रांचा सहभाग अपरिहार्य आहे. त्यात रोबॉट्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांची सांगड घातल्याने आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे.
आपल्याकडे शेतीला मजूर मिळण्यात अजून तरी तितकीशी अडचण येत नाही. त्यामुळे रोबॉट्सविषयी तितकासा गंभीर विचार होत नव्हता. मात्र आता चित्र हळूहळू बदलत आहे. सिंचनासारख्या काही प्रक्रिया रोबॉट्सकडे सोपवल्याने अधिक कार्यक्षम होतात आणि अन्नउत्पादनाचा कार्बन फूटप्रिंट कमी होऊ शकतो, हे आता लक्षात येत आहे. योग्य त्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती हाय-टेक झाल्याने उत्पादनाचं प्रमाण वाढतं.
त्यातला मानवी श्रमाचा भार कमी झाल्याने शेतकरी पशुपालन किंवा फूड प्रोसेसिंग यासारख्या इतर सहउद्योगाकडे लक्ष देऊ शकतो, याचीही जाणीव होत आहे. रोबॉट्सचा शेतीतला सहभाग पर्यावरणाशी योग्य मेळ घालू शकतो, असा विचार होतो आहे. तेव्हा भारतातल्या शेतांमध्ये रोबॉट्स लवकरच दिसू लागतील अशी शक्यता आहे.