– अरुण गोखले
संतांच्या अनुभूतीचा बोध काय किंवा अगदी एखाद्या स्पोर्टसच्या दुकानातील जाहिरातीतील “लाइफ इज ए गेम प्ले इट’ या आशयाचा मजकूर काय! शब्द जरी थोडे वेगळे असले, भाषा जरी भिन्न असली तरी त्याचा आशय हा एकच आहे की बाबांनो! जीवनाकडे एक खेळ म्हणून पाहा आणि तो खेळा.
आता जीवन खेळ म्हणून खेळा हे सांगण्याचा हेतू हाच की आपण खेळाकडे जसा हा एक खेळ आहे म्हणून पाहतो, खेळातली हार-जीत ही जशी आपण मनावर घेत नाही, एखादा डाव चुकला, प्रसंगी पदरात अपयश आले, निराशा आली तरी खचून जायचे नसते. तसे जीवनातल्या सुख-दु:खाच्या क्षणीही आपण आपल्या मनाचे संतुलन कायम राखायचे असते. खेळ म्हणून प्रपंच्याकडे, जीवनाकडे पाहिले पाहिजे, हेच संतांना आपल्याला कळकळीने सांगायचे आहे.
आपल्या या शिकवणीला बळकटी देण्यासाठी साधू-संत-सद्गुरू सांगतात की, खेळ मग तो कोणताही असो, मर्दानी, बैठा खेळ असेल, बुद्धीबळासारखा बुद्धी चातुर्याचा असेल, कोणताही खेळ असला तरी तो खेळताना आपल्याला प्रयत्न, चिकाटी, डावपेच, कधी थोडी माघार तर कधी उठाव, कधी चपळाई तर कधी नरमाई ही घ्यावी लागते, स्वीकारावी लागते. तसेच जर जीवन खेळाचाही आनंद घ्यायचा असेल तर तिथेही हेच सारे करावे लागते.
खेळातलं यशापयश हे जसं आपण हसत खेळत पचवितो, तसेच जीवनातले कडू गोड असे अनुुभव हे पचवावे लागतात. खेळाप्रमाणेच इथेही हेच लक्षात ठेवावे लागते की खेळातला सावकार हा कायम सावकार नसतो किंवा भिकारी हा जसा कायमचाच भिकारी नसतो, तसेच जीवनातलीही कोणतीच परिस्थिती ही कायमची नसते. तिथेही येणे-जाणे, लाभ-हानि, यशापयश हे आहेच.
खेळात नेहमीच आपल्या अपेक्षेप्रमाणे सर्व सवंगडी हे मिळतात असे नाही. तरी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या क्षमता ओळखून त्यांना सोबत घेऊनच आपण खेळतो. तसेच जीवनातही एकमेकांच्या उणिवा ह्या न पाहात बसता, त्या एक दुसऱ्यांनी भरून काढल्या तर खेळाची मज्जा जशी वाढत जाते तसेच जीवनाचा खेळही आपल्याला सुखवून जातो. अशा खेळात आपण रमत असलो तरी शेवटी हा खेळ आहे हे भान राखावेच लागते.