– विलास पंढरी
दुष्ट विचार, पीडा अग्नीत विसर्जन करून जीवनात रंग भरणारा आनंदोत्सव करोना व्हायरसच्या दहशतीखाली यंदाही काहीशा निरुत्साही वातावरणात साजरा होतो आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर होळी साजरी न करण्याच्या सरकारी आदेशाचे पालन सर्वांनी करणे गरजेचे आहे.
भारतभर होळी आणि धुलीवंदन सण वेगवेगळया पद्धतीने साजरा केला जातो. दोन दिवस चालणारा हा उत्सव असून उत्तर भारतात दुसरा दिवस रंगोत्सव म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. महाराष्ट्रात पूर्वी होळीला जास्त महत्त्व होते व रंगोत्सव रंगपंचमीला साजरा होत असे. पण जसजसे राज्यात उत्तर भारतीय, गुजराती लोकांचे प्रमाण वाढत गेले तसतसे रंगपंचमीची जागा धुलिवंदनाने घेतल्याचे दिसत आहे.
आता महाराष्ट्रीय लोक पहिला दिवस होळी पेटवून गोडधोडाचा नैवेद्य दाखवून धार्मिक वातावरणात साजरा करतात, तर परप्रांतियांच्या आक्रमणाने आता दुसऱ्या दिवशी आपणही रंगोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करू लागलो आहोत. त्यामुळे या उत्सवातील दुसऱ्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज होळीचे महत्त्व सांगताना म्हणतात,
दैन्य दुःख आम्हां न येती जवळीं ।
दहन हे होळी होती दोष ।।
मी होळीत माझ्यातले दोष जाळले आणि दोष जाळण्याचा परिणाम असा झाला, की दारिद्य्र व दुःख माझ्या जवळसुद्धा येत नाही.
दोष नाही, तर दारिद्य्र नाही. त्यामुळे दारिद्य्रातून निर्माण होणारं दुःख नाही.
सर्व सुखें येतीं मानें लोटांगणी ।
कोण यासी आणी दृष्टिपुढें ।।
दुःख तर जवळ येतंच नाही, उलट सुख माझ्यापुढे लोटांगण घालतात आणि आम्हाला येऊ द्या म्हणतात. पण मी त्यांना माझ्या डोळ्यासमोरही उभं करत नाही.
सगळं जग सुखाच्या मागं लागलेलं असताना, तुकोबाराय सुखाला हाकलून लावतात. कारण, त्यांना सुखाची हाव नाही, आणि दोष जाळल्यामुळे दुःख तर आधीच दूर पळून गेलेलं आहे.
दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. दुर्दैवाने सध्या उत्सवात अनेक अपप्रकारांचा शिरकाव झाला आहे; म्हणून जागृत राहात हे अपप्रकार रोखून कर्तव्य बजावायला हवे. देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या 5-6 दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा सण साजरा केला जातो.
कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि अनादिकालापासून राहणारे कोळी बांधव आणि त्यांची कुटुंबे शिमगा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात. मासेमारीसाठी पुरुष समुद्रावर जातात पण होळीच्या दुसऱ्या दिवशी मात्र होडीवर जायचा मान घरच्या स्त्रियांचा असतो. स्त्रियांसाठी हा विशेष उत्सवाचा दिवस असतो.
या दिवशी पूजेचे सामान, फळे, खाद्यपदार्थ असे सगळे सामान सोबत घेऊन पारंपरिक वेशात कुटुंबीय होडीवर जातात. काही लोक होडी समुद्रात नांगरून पूजा करतात तर काही समुद्रात होडीतून फेरी मारत मारत होडीत पूजा करतात. कलश स्थापून, घरातल्या देवीच्या टाकाचे पूजन होडीवर मध्यभागी करतात. त्यानंतर पारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण असा आनंदात हा उत्सव साजरा होतो.
भारतातील आदिवासी जमातीत हा दिवस गुलाल उधळून, टिमक्या-ढोल वाजवून, नृत्य करून स्त्री-पुरुष उत्साहाने साजरा करतात. महाराष्ट्रातील आदिवासी जमातीतील लोकांत होळी हा सण उत्साहाने साजरा केला जातो. होळी साजरा करत असताना आदिवासी लोकांच्या भोजनामध्ये गोड पुरी, मासळी व गोड भात या पदार्थांचा समावेश असतो. सातपुडा पर्वत प्रदेशातील आदिवासी होळीच्या दरम्यान काठी उत्सव साजरा करतात. बाराव्या शतकापासून ही परंपरा सुरू असल्याचे दिसते. दागदागिने घालून, नक्षीकाम करून स्त्री-पुरुष यात सहभागी होतात. विविध वाद्यांच्या तालावर नृत्य केले जाते.
भारताच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या पद्धतीने होळी व धुलीवंदन साजरे केले जातात. उत्तर भारतातील व्रज भागात होळीचे महत्त्व विशेष आहे. येथे कृष्ण आणि होळी असे धार्मिक आचार प्रसिद्ध असून खेडेगावात होळीचे महत्त्व विशेष आहे. लाकडे रचून त्याची होळी पेटविली जाते आणि युवक-युवती त्याभोवती नृत्य करतात. बनारसमधील लहान गावात पुरोहितांनी होळीच्या अग्नीवरून चालत जाण्याची प्रथा आहे.
महाराष्ट्रात होळीच्या अग्नीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे.तसेच सहकुटुंब होळीची विधियुक्त पूजन केले जाते. होळी समोर गाऱ्हाणे, नवस बोलण्याचीही परंपरा आहे. दुःख, दैन्य होळीत विसर्जित करता येते अशी श्रद्धा आहे. प. बंगालमध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. तेथील वैष्णव संप्रदायात गौरपौर्णिमा या नावाने व हा दिवस चैतन्य महाप्रभू यांची जन्मतिथी म्हणूनही श्रीकृष्ण जन्माष्टमी प्रमाणेच भक्तिभावाने साजरा केला जातो.
ईशान्य भारतात महिला होळीचा दिवस विशेष आनंदाने साजरा करतात.राजस्थानमध्ये एकमेकांवर गुलाल उधळून महिला-पुरुष होळी साजरी करतात. पूर्वी संस्थाने असताना तत्कालीन रितीप्रमाणे होळीच्या दिवशी विशेष दरबार भरत असे. गुजरातमध्ये पूर्ण आठवडाभर होळीचा आनंद साजरा केला जातो.