बारामतीत सायन्स पार्कचे उद्घाटन
पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकात तरतूद करणार
बारामती/ जळोची – विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विज्ञान आणि नाविन्यता केंद्र अत्यंत उपयुक्त असून प्रत्येक जिल्ह्यात असे केंद्र उभारण्यासाठी पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र परिसरात उभारलेल्या सायन्स ऍण्ड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र शासन, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग आणि टाटा ट्रस्टच्या वतीने हे केंद्र उभारले आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, उद्योगपती गौतम अदानी, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक सावंत, डॉ. सी. डी. माई, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, प्रीती अदानी, होमी भाभा विज्ञान आणि संशोधन केंद्राचे डॉ. अर्णव भट्टाचार्य, नेहरु विज्ञान केंद्राचे डॉ. सुब्रत चौधरी, तरुण वैज्ञानिक गोपाली जी., ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, राज्यात 6 ठिकाणी असे केंद्र उभारण्यात येत आहे. अशा केंद्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण होईल. जागतिक पातळीवर शिक्षण क्षेत्रात वेगाने बदल होत असून आनंदाचा निर्देशांक अधिक असलेली राष्ट्रे प्रभावशाली तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मुलांना देतात. अशी नावीन्यपूर्ण आणि कौशल्याधारीत शिक्षण प्रणाली अनुकूल बदल घडवून आणण्यासाठी उपयुक्त आहे.
अनिल काकोडकर म्हणाले की, विज्ञान केंद्राचे सर्वात पुढारलेले स्वरूप बारामतीला साकारत आहे. एक लाख विद्यार्थ्यांनी केंद्राला आतापर्यंत भेट दिली आहे. विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वैज्ञानिकदृष्टी निर्माण होणे गरजेचे असून त्यासाठी केंद्र उपयुक्त ठरेल. प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षातून एकदा या केंद्रात जाता यावे, असा प्रयत्न आहे.
यावेळी खासदार सुळे यांनी मार्गदर्शन केले. ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले. सारंग साठे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. शारदा संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीस विज्ञानगीत सादर केले. ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि रयत शिक्षण संस्था यांच्यात यावेळी सामंजस्य कराराचे आदानप्रदान करण्यात आले. नेहरु विज्ञान केंद्र आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने तयार केलेल्या प्रकल्पाचे ट्रस्टला हस्तांतरण करण्यात आले.
वैज्ञानिक मनोभूमिका यशासाठी महत्त्वाची
शरद पवार म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात विज्ञानाविषयी आस्था निर्माण करणारा हा प्रकल्प आहे. या केंद्रामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि उत्सुकतेत भर पडेल. जीवनात पुढे जाण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक मनोभूमिका तयार केल्यास जीवनात यश नक्की मिळेल. विज्ञान आणि नावीन्यता केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाची झेप लक्षात येईल. त्यातून वैज्ञानिकदृष्टी विकसित होईल, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल, विज्ञानाविषयी आकर्षण कायम राहून प्रोत्साहन मिळेल.