नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून बंद पडलेल्या शाळा आता पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. यावर केंद्र सरकार गांभिर्याने विचार करत आहे. 1 सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु होणार आहेत. या प्रस्तावावर विचार सुरु असल्याचे संकेत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले आहेत. अनलॉक-3ची मुदत 31 ऑगस्टला संपणार आहे. त्यानंतर नव्या गाईड लाईन्समध्ये यासंबंधी घोषणा होण्याची शक्यता आहे.
अनलॉकच्या प्रक्रियेनुसार सर्व व्यवहार सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार केंद्र सरकार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेऊ शकते. त्यात 10 ते 12वीच्या वर्गांना परवानगी दिली जाऊ शकते. नंतर क्रमाने विद्यार्थ्यांना बोलावले जाऊ शकते. त्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी याची नियमावली शाळांना दिली जाणार आहे.
पहिल्या 15 दिवसांमध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास सांगितले जाऊ शकते. यानंतर वेळमर्यादेत सहावी ते नववीचे वर्ग सुरु केले जाऊ शकतात. एका इयत्तेतील सर्व तुकड्यांना एकाच दिवशी शाळेत बोलावले जाणार नाही. प्रत्येक तुकडीला दिवस ठरवून दिला जाईल. याशिवाय शाळा आणि वर्ग सॅनिटाइज करणं अनिवार्य असणार आहे.
शाळांना दोन शिफ्टमध्ये काम करण्यास सांगितले जाऊ शकते. ही वेळा सकाळी 8 ते 11 आणि 12 ते 3 अशी असू शकते. सॅनिटाइज करण्यासाठी एक तास दिला गेला आहे.
मात्र प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळांना सुरु करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे संकेतही केंद्राने दिली आहेत. मात्र देशात करोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.