पुणे – गणेशोत्सवासाठी जगभरातून गणेशभक्त तसेच पर्यटक पुण्यात येतात. या काळात पेठांमध्ये वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पोलिसांनी शाळांच्या वेळा तसेच वाहन पार्किंगच्या जागा निश्चित करून द्याव्यात. त्यामुळे गणेशोत्सवात वाहतूक कोंडी होणार नाही ही बाब लक्षात घेऊन नियोजन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अर्बन सेलने पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रामुख्याने गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरातील मध्यवर्ती भागातील सर्व शाळा, सकाळाच्या आणि दुपारच्या सत्रात दुपारी चार वाजेपर्यंतच सोडण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम, यांच्यासह, नितीन जाधव, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, फाहिम शेख, सुजीत जगताप, प्रसाद खंडाळे, स्वप्नील खंडारे यावेळी उपस्थित होते.
या आहेत प्रमुख मागण्या…
- पेठांमधील रस्ते आधीच अरुंद आहेत. अनेक मोठ्या आणि नामवंत शाळा पेठांमध्ये आहेत. अशा स्थितीत गणेशोत्सवात शाळा सायंकाळी सुटत असल्याने स्कूल बस तसेच इतर शालेय वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते.
- या शाळा दुपारीच नियोजन करून सोडल्यास सायंकाळी केवळ पर्यटक तसेच गणेशोत्सवासाठी आलेले भाविकच रस्त्यावर येतील. त्यामुळे कोंडी टाळण्यास मदत होईल.
- या शाळांची मैदाने सायंकाळी 5 नंतर रात्री 1 पर्यंत भाविकांना पार्किंगसाठी उपलब्ध करून दिल्यास रस्त्यावर वाहने लागणार नाहीत. परिणामी, रस्त्यात वाहनांचे अडथळे येणार नाहीत. तसेच भाविकांचीही सोय होईल.
- पेठांपर्यंत येण्यासाठी तसेच काही रस्त्यांवर पीएमपीची फीडर सेवा उपलब्ध करून दिल्यास भाविक शहरात येताना वाहने आणणार नाहीत.