पाचवी आणि आठवीच्या परीक्षा आज होणार
मंचर – जिल्ह्यात आणि तालुक्यात पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा रविवार (दि. 16) होणार आहेत. परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत पार पडण्यासाठी भरारी पथके नेमावीत, अशी मागणी आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार विजेते सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ सातपुते यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यात पाचवीसाठी 303 केंद्र, आठवीसाठी 175 केंद्र आहेत. यावेळी शिक्षणतज्ज्ञ रामभाऊ सातपुते म्हणाले की,जिल्ह्यात आणि तालुक्यात पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत पार पडण्यासाठी भरारी पथके आवश्यक आहेत. भरारी पथकांनी शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा केंद्रांना अचानक भेटी द्याव्यात. कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार दिसून आल्यास तात्काळ संबधितावर कारवाई व्हावी.
पुणे जिल्ह्यात शिरुर तालुका शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल आहे. आंबेगाव आणि जुन्नर तालुकेही अग्रेसर आहेत. जिल्ह्यात सर्वच भागांत परीक्षा आनंदी वातावरणात व्हाव्यात. शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षांना शालेय शिक्षणात फार महत्त्वाचे स्थान आहे. वर्षभर नियमितपणे अभ्यास करणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. ही जबाबदारी सरकारची आहे. शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा केंद्रावर या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी तसेच तणावविरहित होण्यासाठी प्रयत्न व्हावेत.