तेलाचा पुनर्वापर : अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
पिंपरी (प्रतिनिधी) – शहरामध्ये ठिकठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थ ठेवून त्यांची सर्रास विक्री केली जात आहे. यामुळे शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील सर्व मुख्य रस्ते, चौक, शाळा-महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या बाहेर देखील अनेक व्यावसायिकांनी हातगाड्या लावून दुकाने थाटली आहेत. शहरातील सर्वात मोठ्या वायसीएम रुग्णालयाच्या परिसरामध्ये रस्त्याच्या कडेलाच उघड्यावर अन्नपदार्थ तयार करुन सर्रास विक्री केली जाते. अनेक हॉटेलचालक पदार्थ बनविण्यासाठी अस्वच्छ पाण्याचा वापर करतात. तसेच हे विक्रेते खाद्य तेलाचा सर्रास पुनर्वापर करत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
अशा तेलात तळलेले खाद्यपदार्थ शरीरात कोलेस्ट्रॉल वाढवितात. सोबतच वारंवार वापरणाऱ्या तेलामुळे हृदयाला धोका निर्माण होतो. पोटाचे आणि किडनीचे आजारही बळावतात. अन्न व औषध प्रशासनाकडून अधून-मधून अशा व्यावसायिकांवर कारवाईचा फार्स केला जात असला तरी याची फारशी भीती व्यावसायिकांमध्ये दिसून येत नाही. कारवाई झाली तरी नियमानुसार दंड भरुन हे पुन्हा आपला व्यवसाय त्याच पद्धतीने सुरू ठेवतात.
हॉटेल व्यावसायिकांची नियमित चौकशी केली जाते. एखाद्या व्यावसायिकाकडून नियमानुसार खाद्यपदार्थांची विक्री केली जात नसेल तर त्याच्यावर कारवाई केली जाते. अशा प्रकारे नियम मोडून अस्वच्छ ठिकाणी व दर्जाहीन खाद्यपदार्थांची विक्री केली जात असेल तर ग्राहकांनी अन्न व औषध विभागाकडे तक्रार करावी.
– संजय नारगुडे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग
अन्नपदार्थांवर बसतेय धूळ
अन्नपदार्थ सुरक्षितरित्या झाकून ठेवण्यात येत नाहीत. अनेक ठिकाणी आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरलेली असते. त्यातच शहराच्या अनेक भागामध्ये रस्त्याची कामे सुरु आहेत. त्यामुळे शहरामध्ये बहुतांश ठिकाणी धुळीचा लोट पहायला मिळतात. उघड्या अन्नपदार्थावर ही धूळ जात असल्याने हे अन्नपदार्थ खाण्यासाठी कितपत सुरक्षित आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.