अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादनात घट ः रोपांच्या मागणीत वाढ
रांजणी-पुणे जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यात ऊस गाळपाचे कारखाने देखील मोठ्या प्रमाणात आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे ऊस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे यंदा ऊस रोपांची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. आगामी काळात ऊस लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी ऊस रोपांवरच भर दिला आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील बहुतांश ऊस रोपवाटिका व्यवसायिकांमध्ये ऊस रोपे तयार करण्याची लगबग सुरु झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सुरू उसाची लागवड डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत केली जाते; परंतु लागणीचा योग्य कालावधी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा आहे. या उसाची तोडणी साधारण 12 ते 14 महिन्यांनी केली जाते. उसाचे उत्पादन हवामानावर बरेचसे अवलंबून असते. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात तापमान कमी असते. त्यामुळे ऊस उगवणीस एक ते दीड महिन्याचा कालावधी लागतो. सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने उस पिकाचे जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. परंतू आता ऊस रोपांच्या मागणीत पावसाने विश्रांती घेतल्याने मोठी वाढ होत असल्याचे दिसून येते. दरम्यान शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी उसाचे चांगले बेणे प्लॉट शोधण्याची धडपड रोपवाटिका चालकांकडून होत आहे. ऊस बेण्याची कमतरता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांकडून जास्त दराने ऊसाचे प्लॉट खरेदी करण्यात येत आहेत. यामुळे सप्टेंबरला बेणे प्लॉटसाठी विक्री होणाऱ्या उसाची किंमत गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 ते 20 टक्यांपर्यंत वाढल्याचे रोपवाटिका चालकांनी सांगितले.
गेल्या वर्षी 3 हजार रुपये टन मिळणारा उस आता 4 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. रोपे तयार करण्यासाठी ऊस बेणे कमी पडत आहे. जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, जुन्नर या तालुक्यांमध्ये रोपवाटिकांचे जाळे पसरले आहे. विशेष करुन शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून उस रोपवाटिका करण्याकडे प्राधान्य दिले असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षात जूनपर्यंत दुष्काळामुळे रोपवाटिकांमधून ऊस रोपांची मागणी फारशी होत नव्हती. परंतू सुरू ऊस लागवड ही डिसेंबर मध्यापासून 15 फेब्रुवारीपर्यंत करता येते. या काळात लागवडीसह खत व पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे केल्यास उत्पादकतेमध्ये वाढ मिळते.
- महापूराच्या थैमानामुळे ऊस लागवड खोळंबली-
ऑगस्ट 2019 मध्ये जिल्ह्यासह सर्वत्रच महापूराने थैमान घातल्यामुळे बहुतांश ठिकाणची ऊस लागवड देखील खोळंबली. अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांनी उस लागवड करण्यास प्रारंभ केला. रोपे लावल्यास तब्बल 1 महिन्याचा कालावधी लागतो यामुळे शेतकऱ्यांनी कांदे लागवड करण्यापेक्षा थेट उसाची रोपे शेतात लागवड करण्यास प्राधान्य दिले जात आहे. - तयार रोपांची लागवड केल्यास चांगली वाढ होत असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांकडून उस रोपांना चांगली मागणी वाढली आहे. गेल्या 2 महिन्यापासून ऊस रोपांना चांगली मागणी वाढली आहे. महापूराच्या काळात रोपवाटिका चालकांची परिस्थिती बिकट होती. परंतू महापूर थांबल्यानंतर ऊस रोपांच्या मागणीत वाढ झाली आहे. रोपांची विक्री दरात वाहतुकीच्या अंतरानुसार काही प्रमाणात वाढ झाली आहे.
– बाळू भुजबळ, रोपवाटिका चालक