पिंपरी – कर्मचाऱ्यांच्या पाच महिन्याच्या संपानंतर आता एसटी सावरू लागली आहे. एसटीच्या वल्लभनगर येथील पिंपरी-चिंचवड आगाराची दररोजची प्रवासी संख्या 2800 इतकी झाली आहे. आगाराला दररोज साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप जवळपास पाच महिने चालला. संपाच्या कालावधीत केवळ 6 बसेस मार्गावर होत्या. त्याच्या माध्यमातून वल्लभनगर आगाराला दररोज केवळ 50 ते 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते. संप सुरू होण्याच्या आधी एसटीला दररोज सरासरी 6 ते 7 लाख रुपये इतके उत्पन्न मिळत होते. तर, दररोजची प्रवासी संख्या 4 हजार इतकी होती. दरम्यान, सध्या पूर्ण क्षमतेने एसटी बसेस सुरू झाल्यानंतर आता एसटीला दररोजचे उत्पन्न साडेचार लाख इतके मिळत आहे. तसेच, प्रवासी संख्या देखील 2800 इतकी झाली आहे. प्रवासी संख्या व उत्पन्न वाढीसाठी एसटीने आवश्यक प्रयत्न सुरू केले आहेत.
सध्या विविध मार्गांवर 45 एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत. चिपळूण, जुन्नर, लातूर, दापोली, विजापुर, हैद्राबाद, महाड, उमरगा, गाणगापुर, वेळास, मुरूम, केळशी, बेळम, अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर, सातारा, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर अशा विविध मार्गांवरील बसेसचा त्यामध्ये समावेश आहे. या एसटी बसेसच्या माध्यमातून सध्या दररोज साडेचार लाख रुपये इतके उत्पन्न वल्लभनगर आगाराला मिळत आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार सध्या नियमित बसेस विविध मार्गांवर सोडण्यात येत आहेत. उन्हाळी सुट्ट्यानिमित्त अद्याप जादा बसेसचे नियोजन केलेले नाही, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.