मुंबई – केंद्रात, राज्यात सत्ता आहे मग कुठल्या वेळेची वाट बघताय? सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुहूर्त बघताय का? असा थेट सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला. मुंबई येथे राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले की, तसेच अजूनही खूप मोठ्या व्यक्ती आहेत, महापुरुष आहेत त्यांना भारतरत्न मिळायचा बाकी आहे. त्यात सावरकर आहेत. गौरवयात्रा काढता मग माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि भाजपचे मंत्री, प्रवक्ते आमदार यांनी इतर महापुरुषांबद्दल वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये केली त्यावेळी त्यांना का थांबवण्यात आले नाही? त्या महापुरुषांबद्दल का गौरवयात्रा काढण्यात आल्या नाहीत? हे निव्वळ राजकारण आहे अशी नाराजी देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पुढे अजित पवार म्हणाले की, आज केंद्र व राज्य सरकार तुमच्या ताब्यात आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांची नावे घेण्यापेक्षा पोलिसांनी दंगल कुणी घडवली ते शोधून काढावे. यामागे कोण सूत्रधार आहे ते समोर येऊ दे आणि जो कुणी दोषी असेल त्याला कडक शासन केले पाहिजे. अजिबात कुणाचा मुलाहिजा बाळगू नका, पण त्यात राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका, असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.
थोडी वाट बघू आणि नाही झाले तर मग…
शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत मिळाली नाही, पीक विम्याची रक्कम मिळाली नाही आणि नियमित परतफेड करणार्या तमाम शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मिळायला हवे होते ते काही प्रमाणातच काहींना मिळाले आहेत. पुरवणी मागण्यांमध्ये आणि बजेटमध्ये ही रक्कम घेतली आहे. त्यातून मंजूर करून देतील. त्यामुळे अंमलबजावणीसाठी थोडा वेळ सरकारला द्यावा लागेल. थोडी वाट बघू आणि नाही झाले तर मग आम्ही आमची भूमिका मांडू, असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.