पाचगणी (सादिक सय्यद, प्रतिनिधी) : जमीन ही शेतकऱ्यांच्या ‘जन्माची भाकरी असते’ असं ग्रामीण भागात म्हटलं जातं. पण गेल्या वर्षी जावळी तालुक्यांत २२ व २३ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे जावळी तालुक्यातील गावांतील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे नुकसान झाले होते. गेल्या वर्षातील सर्वाधिक पाऊस या कालावधीत पडल्याने नदीकाठची शेतजमीन उद्धवस्त झाली होती. अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागातील माती, दगड हे शेतजमिनीवर साचून राहिलेली होती. अनेक विहीरी देखील बुजून गेल्या होत्या. शिवाय शेत जमिनीही खरडून गेल्याच्या घटना अनेक ठिकाणी झाल्या होत्या. त्यामुळे शेत जमिन ही नापिक झाली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आतापर्यंत सर्वाधिक शेतीचे नुकसान या अतिवृष्टीमुळे झाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठे नुकसान सहन करावे लागले होते.
त्यामुळे जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि शेतीचा प्रश्न मार्गी लावण्याकरीता प्रशासन व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून नाम फाऊंडेशनच्या सहकार्यातून नुकसानीत शेतीची दुरुस्ती करण्यात येत आहे. नदीकाठच्या शेत जमिनीची दुरुस्ती प्राधान्याने करण्यात येणार आहे. नदी-ओढ्यांचे दुरुस्तीचेही काम केले जाणार आहे. त्यामुळे पाऊस झाला तरी शेतजमिनीचे अधिकचे नुकसान होणार नाही.
पोकलॅंड आणि जेसीबीच्या माध्यमातून हे शेत दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे आता शेतजमिन ओलीताखाली येणार आहे. त्यामुळे जावळी तालुक्यांतील भुतेघर, बोडारवाडी, वाहीटे गावातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं असून शेतकऱ्यांनाकडून समाधान व्यक्त होत आहे.