अहमदाबाद – पृथ्वी शॉ, आकर्षित गोमेल व सचिन यादव यांनी निराशा केल्यानंतरही अजिंक्य रहाणे व सर्फराज खान यांनी फटकावलेल्या दमदार शतकी खेळींच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पहिल्याच दिवशी सौराष्ट्रविरुद्ध पहिल्या डावात 3 बाद 263 धावा उभारल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सर्फराज 121, तर रहाणे 108 धावांवर खेळत आहेत.
मुंबईच्या डावाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. त्यांचे पहिले तीन प्रमुख फलंदाज अपयशी ठरले. मात्र, कसोटी संघातून खेळताना आलेल्या अपयशावर होत असलेल्या टीकेला आपल्या बॅटने उत्तर देत रहाणेने जिद्दी शतकी खेळी केली.
त्याने आपल्या नाबाद खेळीत तब्बल 250 चेंडूंचा सामना केला व 14 चौकार आणि 2 षटकार फटकावले. रहाणेला सुरेख साथ देत आक्रमक फलंदाजी करत सर्फराजनेही शतकी पल्ला पार केला. त्याने नाबाद खेळीत 219 चेंडूत 15 चौकार व 2 षटकार फटकावले.
काही दिवसांपूर्वी रहाणेकडून भारताच्या कसोटी संघाचे उपकर्णधारपद काढून घेण्यात आले होते. त्याला कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी रणजी स्पर्धेत खेळण्याचा सल्ला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिला होता. त्यानेही शतकी खेळी करत आपला दर्जा सिद्ध केला. हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 36 वे शतक ठरले असून, रणजी स्पर्धेच्या इतिहासातील हे त्याचे 24 वे शतक आहे.