मायणी – मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी आणि पुरावे नसल्याचे कारण देत आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. परंतु आता एकीने लढा दिल्यानंतर आणि आंदोलन केल्यानंतर जिल्ह्याजिल्ह्यात नोंदी कशा सापडू लागल्या, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. आता मराठा समाजाचे आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
मायणी चांदणी चौकात जरांगे पाटील यांचे गुरुवारी रात्री जल्लोषात स्वागत झाल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेस हजारोंच्या संख्येने मराठा समाजाच्या बांधव व भगिनींनी उपस्थिती दर्शवली होती. या सभेचे नियोजन मायणी मराठा सकल बांधव समन्वय समितीने केले होते. पोलीस अधीक्षक समीर शेख, उपअधीक्षक अश्विनी शेंडगे व त्यांच्या टीमने चोख बंदोबस्त ठेवला होता.
जरांगे-पाटील म्हणाले, मराठा समाजाला षडयंत्र करून सत्तर वर्षे आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण नसल्याने समाजविकासाचा जो मोठा अनुशेष निर्माण झाला आहे, तो आता आम्हाला भरून पाहिजे. जर सत्तर वर्षांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिले असते, तर जगाच्या पाठीवर मराठा समाज सर्वांत प्रगत जात ठरली असती. मराठ्यांची विराट शक्ती उभ्या देशाने बघितली आणि मराठ्यांच्या एकीपुढे सरकारला नमते घ्यावे लागले आहे.
परंतु, आता आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आंदोलनात फूट पाडायचे प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे 24 डिसेंबरपर्यंत सावध राहावे. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी भान ठेवावे, नाहीतर नंतर समाज त्यांचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही शेतीचा बांध फोडला तर दोन वर्षे बोलत नाही. विरोध करणाऱ्यांसाठी आम्हाला हातात दगड घ्यायची पण गरज नाही, कारण आम्हा शेतकरी व कष्टकऱ्यांचा हातच त्यासाठी पुरेसा आहे. मराठा समाजाची दोन अंगे आहेत.
मराठा क्षत्रिय असून त्याला लढायचं कसं ते माहीत आहे. तसेच शेती करुनही तो देशाला अन्न पुरवतो. आज मराठा समाज राज्यात सर्वत्र असून त्यांचं रक्ताचं नातं आहे. मराठा समाजाला सर्व निकषात बसूनही आरक्षण मिळत नाही. त्यामुळे आरक्षणाचा हा लढा ताकदीने लढायचा आहे.
1 डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू करा
1 डिसेंबरपासून गावोगावी साखळी उपोषण सुरू करावेत. आरक्षण घेतल्याशिवाय कोणीही मागे हटणार नाही असा निर्धार सर्वांनी केला पाहिजे. समाजाला आरक्षणाची पुन्हा संधी नाही. या संधीचे सोने करुया. पहिला आणि शेवटचा लढा आहे. सरकारने वेळ मागून घेतल्याने ते कोंडीत आहेत. तर आपली कसोटी सुरू आहे. महाराष्ट्रातील ही लाट उसळली असून अनेक पिढ्यांची खदखद बाहेर पडली आहे. मराठा समाजाची टीम तयार करुन गावांगावात जागृती करा, आंदोलन शांततेत करा, जाळपोळ आणि उद्रेक अजिबात करु नका,आरक्षणासाठी आत्महत्या करु नका.तरुणांनी आत्महत्या केली तर आरक्षण कुणासाठी मागायचे.असे सल्लेही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिले.