पाटण वनपरिक्षेत्रात सर्वाधिक 355 गावे
संतोष पवार
सातारा – जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी वन विभागाने वन्यप्राण्यांचा उपद्रव असणाऱ्या जंगलव्याप्त प्रदेशातील 732 गावांची यादी जिल्हा परिषदेस सादर केली आहे. पाटण वनपरिक्षेत्रातील सर्वाधिक 355 गावांचा आणि सातारा, मेढा, महाबळेश्वर, वाई वन परिक्षेत्रातील अनेक गावांचा यामध्ये समावेश आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील वन्यजीव प्रवण क्षेत्रातील तीन तालुक्यांतील 36 गावांचाही यामध्ये समावेश आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुगम व दुर्गमसाठी सात निकष ठरवले आहेत. अन्य जिल्ह्यात सातपैकी चार निकष लागू होणाऱ्या शाळा दुर्गम ठरवण्यात आल्या आहेत. वन्यप्राण्यांचा उपद्रव असणाऱ्या जंगलव्याप्त प्रदेशात येत असल्यास एक निकष पूर्ण होत असल्याने अनेक शिक्षकांनी वन विभागाचे उंबरे झिजवण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा हे शिक्षक बदल्यांबाबत राज्यस्तरीय समितीवर सदस्य असून जिल्ह्यात शिक्षकांच्या बदल्यांना तीन निकष लावायचे की चार निकष लावायचे हा अधिकार राज्य शासनाने त्यांना दिला आहे. या अधिकाराचा वापर करत गौडा यांनी सातपैकी चार निकषात बसणाऱ्या शाळा दुर्गम घोषित केल्या आहेत. चार निकष लावल्याने दुर्गम शाळांची संख्या निम्म्याहून कमी आली आहे. विनय गौडा यांनी शिक्षक बदल्यांबाबत कडक नियमांची अंमलबजावणी केल्याने दुर्गम शाळांचा आड दडू पाहणाऱ्या शिक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
अनेक शिक्षकांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीत राबता वाढवला आहे. याशिवाय कोणत्या विभागाकडून निकषात बसण्यास मदत होतेय का याचीही चाचपणी सुरु आहे. वन्यप्राण्यांचा उपद्रव असणाऱ्या जंगलव्याप्त प्रदेशात बसण्यासाठीही अनेक शिक्षकांनी वन विभागाचे उंबरे झिजवल्याची चर्चा आहे. यावर्षी जंगलव्याप्त प्रदेशात येणाऱ्या गावांची संख्या लक्षणीय दिसून येत आहे. सातारा वनपरिक्षेत्रातील 76, मेढा वनपरिक्षेत्रातील 105, महाबळेश्वर वनपरिक्षेत्रातील 95, पाटण वनपरिक्षेत्रातील 355, वाई वनपरिक्षेत्रातील 51, कराड वनपरिक्षेत्रातील 14 गावांचा जंगलव्याप्त प्रदेशात समावेश आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील सातारा तालुक्यातील सात, पाटण तालुक्यातील 25, मेढा परिक्षेत्रातील 4 अशी 36 गावे या प्रदेशात येत आहेत. जिल्ह्यातील 732 गावे वन्यप्राण्यांचा उप्रदव असणाऱ्या जंगलव्याप्त प्रदेशात येत असल्याने सध्य परिस्थितीत या गावातील शाळांमधील शिक्षकांनी एक निकषात बसत असल्याचा आनंद घेतला आहे. जिल्हा परिषदेने प्रसिध्द केलेल्या यादीत या 732 गावांचा समावेश असून यावर हरकती दि. 2 एप्रिलपर्यंत घेता येणार आहेत. दरम्यान जिल्ह्यात कोरेगाव, खटाव, माण, फलटण या तालुक्यातील एकही शाळा वन्यप्राण्यांचा उपद्रव असणाऱ्या जंगलव्याप्त प्रदेशात आलेली नाही.
————–
“दुर्गम’साठी शिक्षकांकडून सबकुछ’
सुगम, दुर्गम निकषांवरुन शिक्षक बदल्या होणार असल्याने अनेक शिक्षकांनी आपली शाळा दुर्गममध्ये राहावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. दुर्गमच्या नावाखाली होत असलेली फसवेगिरी विनय गौडा यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला असला आणि काही शाळा सुगममध्ये आल्या असल्या तरी तेथील भौगौलिक परिस्थिती, अन्य सोयीसुविधा, निकष यांची पुन्हा तपासणी करण्याची गरज आहे. मात्र, आपली शाळा दुर्गमच राहिली पाहिजे यासाठी अनेक शासकीय कार्यालयांचे उंबरे शिक्षकांच्याकडून झिजवण्याचे काम सुरु असून “दुर्गम’साठी “सबकुछ’ अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येत आहे.