सर्वपक्षीय नेतेमंडळींचा एल्गार; दहा टीएमसी पाणी वाढवून देण्याची मागणी
सातारा – एका उपखोऱ्यातील पाणी दुसऱ्या उपखोऱ्यात वळवून नेण्यास मनाई असतानाही, सातारा जिल्ह्यातील पाणी दुष्काळी तालुक्यांना न मिळता, अन्य जिल्ह्यांना दिले जात आहे. कृष्णा पाणी तंटा लवादाकडून मिळणाऱ्या 84 टीएमसी पाण्यातून दहा टीएमसी पाणी सातारा जिल्ह्यातील अवर्षणप्रवण भागातील उरमोडी, जिहे- कठापूर, टेंभू, तारळी, ब्रह्मपुरी, वसना-वांगणा या प्रकल्पांना वाढवून द्यावे, अशी माण-खटाव तालुक्यातील जनतेची मागणी आहे. या दोन्ही तालुक्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी देण्यास सरकारने पुढाकार घ्यावा, अन्यथा प्रसंगी रस्त्यावर उतरण्याबरोबर न्यायालयीन लढाई लढू, असा इशारा माण-खटाव तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळींनी दिला.
जलसंपत्ती दिनानिमित्त माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्या पुढाकाराने शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय नेतेमंडळींची बैठक रविवारी झाली. माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, धैर्यशील कदम, रणजितसिंह देशमुख, डॉ. संदीप पोळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार, अलीम मोदी, शकील मुजावर उपस्थित होते. डॉ. येळगावकर म्हणाले, माण-खटाव तालुक्यांतील अनेक भागात पाणी प्रश्न तसाच आहे. या प्रश्नासाठी अनेक लढे उभारले, तरी हा प्रश्न सुटला नाही.
अवर्षणप्रवण भागाला प्राधान्याने पाणी देण्याची सूचना असतानाही दुष्काळी तालुके दुर्लक्षित आहेत. या प्रश्नावर सर्वपक्षीय नेतेमंडळी एकजूट करुन लढा उभारत आहेत. सरकारने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. जिल्ह्याचे पाणी प्राधान्याने जिल्ह्याला मिळण्यासाठी गट, तट विसरू एकत्र येऊया. दुष्काळी भागातील प्रत्येक योजनेला दोन-तीन टीएमसी पाणी मिळाल्यास, कायम वंचित भागाला पाणी मिळणार आहे. उरमोडीची पाच आवर्तने माण-खटावला मिळण्याची गरज आहे. प्रत्यक्षात दोन-तीन आवर्तने मिळत असल्याची टीका डॉ. येळगावकर यांनी केली. सोळशीसारखी नवीन उपसा सिंचन योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. ही योजना पूर्णत्वास गेल्यास फलटण, कोरेगाव, खटाव, माण या भागातील पांढऱ्या पट्ट्यात असलेल्या वंचित गावांना पाणी मिळणार आहे.
केंद्राच्या जलनीतीनुसार पाणी वापराचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. प्रत्येक योजनेतून प्राधान्याने पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यानंतर सिंचन, जलविद्युतनिर्मितीसाठी पाणी वापरता येणार असल्याचे अनिल देसाई म्हणाले. उरमोडीचा स्वतंत्र मुख्य कॅनॉल गरजेचा आहे. या योजनेतील सर्व पंपहाऊस पूर्ण क्षमतेने सुरू करून माण-खटावला आठमाही पाणीपुरवठा करावा.
जिहे-कठापूर ही आठमाही स्वरुपाची योजना मंजूर करावी, टेंभू योजनेचे पाणी 16 गावांना पिण्यासाठी व सिंचनासाठी पुरवावे. तारळी योजनेचे पाणी आठमाही पद्धतीने खटाव-माण तालुक्यांमधील लाभक्षेत्रातील गावांना पोटकालवे, चाऱ्या काढून पुरवावे. ब्रह्मपुरी योजनेतू वंचित गावांना पाणी द्यावे, अशा मागण्या घार्गे यांनी केल्या.