सातारा – कांद्याची भाववाढ, एलपीजी गॅसची दरवाढ, समान पाणी वाटप नसल्याने त्रस्त झालेला बळीराजा, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र अशा विविध विषयांवरून वंचित बहुजन आघाडीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सुमारे दोन तास धरणे आंदोलन केले. महागाईच्या तडाख्यापासून सर्वसामान्यांची सुटका करा, अशी मागणी करत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.
रिपब्लिकन सेनेचे चंद्रकांत खंडाईत, गणेश कारंडे, दादा केंगार, लाल निशान पक्षाचे विजयराव निकम, परिवर्तन संघटनेचे मिनाजभाई सैयद, विजय मांडके संजय माने, राष्ट्रीय जनता पक्षाचे संदीप खरात, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देसाई व कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले .
निवेदनात म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिकांकडून ईव्हीएमला विरोध आहे. सर्वसामान्यांचा आवाज हा बॅलेट पेपरने व्यक्त व्हावा, त्यामुळे आगामी निवडणुका बॅलेट पेपर द्वारे घेण्यात याव्यात, कांदा भाव वाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. 2014 पासून 24 वेळा कांदा निर्यातबंदी झाली आहे. ग्राहकांना कांदा परवडणाऱ्या दरात मिळावा. एलपीजी गॅस उत्पादक भारत स्वतः असताना या गॅसच्या किमती बाबत चढउतार होत आहेत.
ग्राहकांना सरसकट अनुदानासहित माफक किमतीमध्ये सिलेंडर मिळावा शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न हटवण्यासाठी समान पाणी वाटप करण्यात यावे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे शेतकऱ्यांचे कुटुंब अडचणीत येत आहेत, त्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये पिकांची औषधे खते बियाणे अवजारे तात्काळ उपलब्ध करून शेतीमालाला महागाई निर्देशांकाप्रमाणे हमीभाव द्यावा, बेरोजगारीमुळे वाढती गुन्हेगारी अडचणीचा विषय आहे. कौशल्य विकास व रोजगार उद्योग विभागाच्या किचकट अटी शिथिल करून वित्तीय संस्थांकडून तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुमारे दोन तास विविध मागण्यांबाबत जोरदार घोषणाबाजी करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले.