आ. महेश शिंदे; उपसरपंचांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा प्रवेश
कोरेगाव – कोरेगाव विधानसभा मतदारसंघ राज्यात आदर्शवत बनविण्याचे शिवधनुष्य उचललेल्या आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खेड नांदगिरी येथील उपसरपंच राजेंद्र कुमार कदम यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
कठापूर, तडवळे संमत कोरेगाव या गावांपाठोपाठ आता खेड नांदगिरीचा विकासकामांद्वारे कायापालट करण्याचा शब्द आमदार महेश शिंदे यांनी दिला. यावेळी त्यांनी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी मंजूर करत ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भरीव मदत करण्याचा शब्दही दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.
आमदार महेश शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत उपसरपंच राजेंद्र कुमार कदम, माजी सरपंच प्रमोद उर्फ संजय कुमार कदम, ग्रामपंचायतीचे सदस्य, खेड नांदगिरी विकास सेवा सोसायटीचे संचालक यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी आमदार शिंदे यांच्या उपस्थितीत खटाव येथील निवासस्थानी प्रवेश केला.
आमदार महेश शिंदे यांनी भगवी शाल देऊन उपसरपंच राजेंद्र कुमार कदम यांच्यासह प्रत्येकाचे स्वागत केले. यावेळी खेड नांदगिरी गावातील अंतर्गत रस्ते ट्रीमिक्स कॉंक्रिटीकरण व बंदिस्त गटार करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आमदार महेश शिंदे यांनी जागेवरच मंजूर केला. पाणंद रस्तेही नजिकच्या काळात केले जातील, असे शिंदे यांनी सांगितले. माजी सरपंच संजय कदम, विकास सोसायटीचे माजी चेअरमन मदन कदम, अमरसिंह कदम, युवा नेते शरद कदम व धनवान कदम उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजधानीवर स्वारी
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी खेड नांदगिरीमध्येच अनेक वर्ष आहे. या गावाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराला सदैव साथ दिली. मात्र पक्षाने खेड नांदगिरीचा अपेक्षित विकास कधीच केला नाही. राज्यातील मोठमोठ्या मंत्र्यांचे कार्यक्रम गावात झाले, मात्र गावासाठी कधीच मोठा निधी मंजूर झाला नव्हता. आमदार महेश शिंदे यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देऊन ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोठे मन दाखविले. कार्यकर्त्यांना त्यांनी ताकद दिली. आजच्या प्रवेश कार्यक्रमामुळे आ. महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राजधानीवर स्वारी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.