सातारा – शुक्रवार पेठेमध्ये असणाऱ्या ऐतिहासिक मोती तळ्याला सध्या शैवालाने ग्रासले आहे. या तळ्याचे संवर्धन न झाल्यास हा ऐतिहासिक ठेवा निकामी होण्याची भीती निर्माण झाली आहे. या तळ्याला पालिकेने पुढाकार घेऊन मंगळवार तळे फॉर्म्युला लागू करावा, अशी मागणी होत आहे. तळ्यातील तुंबलेल्या पाण्याची दुर्गंधी सुटू लागली आहे.
सातारा शहरामध्ये तळी आणि हौद यांची एक वेगळी परंपरा आहे. या हौदांचा इतिहास आणि त्यांच्या वास्तूरचना रेखीव असल्याने त्याचे संवर्धन अग्रक्रमाने करणे गरजेचे आहे. त्यातून शहर पर्यटनाला एक वेगळा वाव मिळू शकतो. शुक्रवार पेठेतील बाजीरावची विहीर ही अशाच स्थापत्यशास्त्राचा एक नमुना आहे. मात्र, साताऱ्यातील वास्तुशास्त्राचा हा ऐतिहासिक ठेवा देखभालीअभावी अडगळीत पडला आहे. शुक्रवार पेठेतील ऐतिहासिक मोती तळे सुद्धा अशाच अनास्थेचा बळी ठरण्याची भीती आहे. इतिहासातील संदर्भानुसार प्रतापसिंह महाराज यांच्यानंतर गादीवर आलेल्या आप्पासाहेब महाराज यांनी राजवाडा बांधल्यानंतर भवानी तलावाला पाण्याची सोय व्हावी म्हणून मोती तळ्याचे बांधकाम केले. येथे रेशीम व्यावसायिक करणारे कारागिर येत असत. आणि ते रेशीम मोत्यासारखे चमकावे यासाठी पाण्याचा वापर करत. असे रेशीम मोत्यासारखे चमकवणारे तळे म्हणून या तळ्याला मोती तळे असे नाव पडले. सध्या हे तळे शैवालाने ग्रासल्यामुळे शेवटच्या घटका मोजत आहे. परिसरामध्ये शैवालयुक्त पाण्याची प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांचे निवासस्थान जलमंदिर व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निवासस्थान असलेले सुरुची या दोन्ही निवासस्थानाच्या मार्गावर बरोबर मधोमध मोती तळे वसले आहे. उदयनराजे भोसले यांचे समर्थक माजी नगरसेवक वसंत लेवे यांनी पुढाकार घेऊन मंगळवार तळ्याचे एकहाती सुशोभीकरण केले. पाण्यामध्ये वॉटर फाउंटन तळ्याला चारी बाजूने तारेचे कंपाउंड हँगिंग गार्डन विद्युत रोषणाई अशी व्यवस्था करून त्या तळ्याचे सौंदर्य वाढवले. त्यापूर्वी माजी उपाध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांनीही तळे स्वच्छ करम्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, सध्या मोती तळ्याच्या रक्षणासाठी पुढाकार घेणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सातारा पालिकेत सध्या प्रशासक राजवट आहे. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी या तळ्याच्या विकासासाठी लक्ष घालून त्याच्या सुशोभिकरणाचा विषय हाती घ्यावा ही सातारकरांची मागणी आहे. या तळ्याचा वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्याने प्रशासनाने सुशोभिकरणावर अनेक मर्यादा आल्या आहेत. मात्र, असे असले तरी तळ्याचा गाळ आणि शैवाल उपसून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कार्यान्वित करणे ही पालिकेची जबाबदारी आहे, ती त्यांनी पार पाडावी अशी माफक अपेक्षा आहे. या तळ्यात मोठ्या प्रमाणावर शेवाळ साचले असून पाणी हिरवेगार झाले आहे. भिंतीवर झुडपे वाढली आहेत. नागरिक येता-जाता तळ्यामध्ये कचरा टाकत आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक तळ्याची रया गेली आहे.