कवठे – वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील रेनावळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे वन विभागाच्या राखीव वनक्षेत्रात वणवा लावल्याप्रकरणी मुख्याध्यापक शिवाजी लक्ष्मण पार्टे (रा. वेलंग) व शिक्षिका सौ. नीलिमा गणेश खरात (रा. रेनावळे, ता. वाई) या दोघांना न्यायालयाने प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
रेनावळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेपाठीमागे वनविभागाचे राखीव वनक्षेत्र आहे. मुख्याध्यापक शिवाजी पार्टे व शिक्षिका सौ. नीलिमा खरात यांनी शाळेच्या आवारातील पाला-पाचोळा एकत्र करुन पेटविला होता. वाऱ्यामुळे पेटलेला पालापाचोळा वनक्षेत्राच्या हद्दीत जाऊन त्याठिकाणी असणाऱ्या गवताने पेट घेतला. यामध्ये वनक्षेत्रातील 22 हेक्टर परिसर जळून खाक झाला.
या वणव्यात वनविभागाचे 11 हजार रुपयांचे नुकसान झाले असून याप्रकरणी वनविभागाने मुख्याध्यापक व शिक्षिकेला ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या दोघांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 20 दिवसांची साधी कैदेची शिक्षा जाहीर केली. उपवनसंरक्षक सातारा भारतसिंग हाडा, सहा. वनसरक्षक सातारा गोसावी, वाईचे वनक्षेत्रपाल महेश झाजुर्णे यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल भाऊसाहेब कदम, वनरक्षक संदीप पवार, प्रदीप जोशी यांनी कारवाईत भाग घेतला.