सातारा – ग्रामीण भागाची उन्नती होण्यासाठी ग्रामीण महिलांना रोजगार मिळावा आणि त्या स्वावलंबी व्हाव्यात, यासाठी भटक्या विमुक्त जमाती विकास व संशोधन संस्थेच्यावतीने सुरु असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श ठेवत प्रत्येकाने स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
जकातवाडी (ता. सातारा) येथे भटक्या विमुक्त जमाती विकास व संशोधन संस्थेने नव्याने बांधलेल्या शारदाबाई पवार कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारतीचे उदघाटन व राजमाता जिजाऊ व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन रविवारी खा. शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकर्ता मेळावा आणि रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार लक्ष्मण माने, आमदार बाळासाहेब पाटील, प्रा. भाई शैलेंद्र माने, जीवन बोराटे, सारंग पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, अर्जुन कोकाटे, यशवंत माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, प्रत्येकाने सन्मानाने जगता येण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वत:च्या पायावर उभे राहवे. महिलांमध्ये रोजगार निर्मिती करत त्यांना स्वावलंबी केले पाहिजे.
लक्ष्मण माने म्हणाले, ‘‘संस्थेच्यावतीने तळागाळातील लोकांना स्वत:च्या पायावर उभे केले जात आहे. याठिकाणी रोजगाराचे प्रशिक्षण केंद्रही उभे राहत असून त्याद्वारे प्रत्येकाला रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. शरद पवार यांचे अंतकरण कायमच आपल्यासोबत असून तळागाळातील लोकांना पुढे आणण्याचे काम त्यांनी आतापर्यंत केले आहे. या संस्थेचे उद्घाटन अजून केले नसून शरद पवार पंतप्रधान झाल्यानंतर उद्घाटन घेऊ. ते पंतप्रधान झाले नाहीत तर उद्घाटन करणार नाही, असं मतही त्यांनी मांडले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. प्रा. भाई शैलेंद्र माने यांनी आभार मानले.