सातारा – माण-खटाव तालुक्यांना दुष्काळग्रस्त ठेवण्याची व्यवस्था जाणीवपूर्वक करण्यात आली. पृथ्वीच्या अंतापर्यंत या भागात पाणी येणार नाही, असेही काही जण म्हटले होते. ज्यांना ‘जाणते नेते’ म्हटले जाते, त्यांनीसुद्धा या भागाची खासदारकी भूषवताना, पाणीच नाही, तर द्यायचे कुठून, असे वक्तव्य केले होते. पाणी योजनेचे काम त्यांनीच अडवून ठेवून, दुष्काळग्रस्तांची निंदा केली, अशी टीका आमदार जयकुमार गोरे यांनी शरद पवार व रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता केली.
जिहे-कठापूर पाणी योजनेतील नेर तलाव ते आंधळी तलाव या 14 किलोमीटरच्या बोगद्याचे काम पूर्णत्वाला आले आहे. आमदार गोरे यांनी या बोगद्याची नुकतीच पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महायुतीच्या नेत्यांचे कौतुक करत महाविकास आघाडीवर त्यांनी निशाणा साधला. आ. गोरे म्हणाले, या योजनेमुळे खटाव तालुक्यातील साठ गावांना फायदा होणार आहे. शासकीय मान्यता मिळूनही गेल्या 22 वर्षांपासून योजना तशीच राहिली होती.
जाणत्या नेत्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनीसुद्धा पाणी नाही, तर द्यायचं कुठून, असे अयोग्य वक्तव्य केले होते. गेल्या बारा वर्षांपासून या बोगद्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेसाठी मोलाचे सहकार्य केले. ही योजना पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन व जलपूजन होईल. केवळ राजकीय अनास्थेमुळे रखडलेल्या या योजनेचा खर्च 287 कोटींवरून अडीच हजार कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. ही योजना पूर्णत्वाला जात असल्याने समाधान वाटत आहे.