वाई – वाई वाठार रस्त्यावरील शांतीनगर येथे गुरूवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात खानापूर (ता. वाई) येथील किशोर चव्हाण (वय 45) यांचा जागीच मृत्यू झाला. वाई बाजूकडून दुचाकीवरुन खानापूर स्टॉप येथे घरी निघालेले किशोर चव्हाण यांच्या गाडीला वाईकडे भरघाव वेगात केळी भरुन जाणाऱ्या एका पिकअप जीपने जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाई पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिस कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो वाईच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने व पिकअपचा चालक ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. यावेळी किसन वीर कारखान्याचे संचालक किरण काळोखे, महालक्ष्मी साडी सेंटरचे मालक अमोल जाधव यांनी घटनास्थळावर पोलिस व रुग्णालय प्रशासनास मदत केली. मदतीची वृत्ती, मनमिळाऊ स्वभाव आणि सामाजिक कार्याची आवड असल्याने चव्हाण यांचा वाई तालुक्यातील प्रत्येक गावात मोठा मित्र परिवार आहे. त्यामुळे त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समजताच अनेकांना धक्का बसला. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.