सातारा -सातारा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध असून, पर्यावरणाबाबत बांधिलकी निर्माण व्हावी, या उद्देशाने वन विभागाच्यावतीने जागतिक वन्य दिनानिमित्त 21 मार्चपासून रात्रीच्या जंगल सफारीचा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय उन्हाळ्यात वन विभागाच्या हद्दीतील सातशे पाणवठे विकसित करण्यात येणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी शुक्रवारी दिली.
मोहिते म्हणाले, वन विभागाचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम असून, त्याच्या रंगीत तालमी घेतल्या जात आहेत. कास पठार हे जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आलेले पठार आणि जागतिक वारसास्थळ आहे.
महाबळेश्वर, पाचगणी, ठोसेघर, कोयनानगर, जावळी, पाटण तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीत येणारे भाग सुनियोजित पद्धतीने विकसित केल्यास पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 21 मार्चपासून कास, महाबळेश्वर व कोयनानगर येथे “नाईट जंगल सफारी’ सुरू करण्यात येणार आहे. या सफारीमध्ये सुरक्षिततेचे नियम पाळून वन्यजीवांचा अभ्यास करणे, पाणवठा विकासाचे नियम निश्चित करणे, दुर्मिळ वनौषधी, प्राणीपक्ष्यांची माहिती देणारे स्लाइड शोज्, असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात वन पर्यटनाला प्रचंड वाव आहे. ताडोबा जंगल सफारीच्या धर्तीवर साताऱ्यातही जंगल सफारी आयोजित करता येईल. त्यादृष्टीने हा प्रयत्न आहे. उन्हाळ्यात हिंस्र श्वापदे पाण्यासाठी अथवा शिकारीसाठी मानवी वस्तीत येऊ नयेत, म्हणून जगलांमध्ये पहिल्या टप्प्यात तीनशे आणि दुसऱ्या टप्प्यात चारशे पाणवठे विकसित करण्यात येणार आहेत. देवरायांचा विकास, पाण्याची उपलब्धता आणि दुर्मिळ जलस्रोत शोधून त्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. रात्रीच्या जंगल सफारीची तयारी सुरू आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधावा.