डॉ. भारत पाटणकर; पुनर्वसन मंत्र्यांची बैठक लांबणीवर गेल्याने निर्णय
कोयनानगर – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रालय मुंबई येथे आज त्यांच्या समिती कक्षात कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाबरोबर बैठक आयोजित केली होती. परंतु, अपरिहार्य कामामुळे त्यांनी ती पुढे ढकलली असल्याचे पत्र मिळाले. त्यामुळे आजची बैठकींनंतर आंदोलनाचा निर्णय घेण्याचे ठरवले होते. परंतु, गाववार कार्यकर्त्यांनी दौरा करून १ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता मेळावा घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
कोयना धरणग्रस्तांबाबतीत पालकमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत डॉ. भारत पाटणकर म्हणाले, त्यांनी धरणग्रस्तांबाबतीत केलेले वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे. कोयनानगर येथे २७ मार्च २०२३ रोजी एक महिन्यात मुख्यमंत्र्यांची बैठक घेतो व प्रश्न सोडवतो असे सांगितले व लेखी दिले तेच पाळले नाही.
त्यानंतर मदत व पुनर्वसन सचिवांशी बैठका घेऊन सांगली व सातारा जिल्ह्यात ७९१ कोयना धरणग्रस्तांनी (पाटण, जावळी व महाबळेश्वर) जमीन पसंती दिली आहे. त्यास आठ ते अकरा महिने झाले तरी वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे धरणग्रस्तांना जमीन वाटप सुरू आहे व वाटली आहे असेते म्हणतात ते पूर्णपणे चुकीचे आहे. त्याबद्दल पालकमंत्र्यांच्या निषेधाचा ठराव यावेळी प्रकल्पग्रस्तांनी केला.
यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले, त्यांनी म्हटल्याप्रमाणे अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी आदेश काढून वाटप उद्यापासून सुरू करावे. नाही तर आंदोलन सुरू करणारच आहे. परंतु, आंदोलन सुरू करूनही वाटप सुरू केले नाही तर ही जनता निवडणुकीत त्यांचे काय करायचे ते ठरवेल. ना. अजित पवार यांनी येथे येऊन सातबारा वाटप केले ते चुकीचेच होते. परंतु, आता या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री आहेत, ते बोलतात ते करतात अशी ख्याती आहे.
परंतु, कोयना धरणग्रस्तांबाबतीत कुठे घोडे अडतंय. त्यांनी लक्ष घालून या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवावा, नाही तर त्यांच्यावरूनही जनतेचा विश्वास उडेल. यावेळी संतोष गोटल, हरिश्चंद्र दळवी, महेश शेलार, सचिन कदम, राम कदम, पी. डी. लाड, सीताराम पवार, श्रीपती माने, किसन सुतार, विनायक शेलार, दाजी शेलार, तानाजी बेबले, जयराम कांबळे, अनिल देवरूखकर उपस्थित होते.