सातारा, (प्रतिनिधी) – सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाचे मोठी ताकद आहे. दिव्यांगासाठी काम करताना प्रहार ने दोन्ही मतदारसंघात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार केले आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात प्रहारची भूमिका महत्वाची ठरणार आहे. आमदार बच्चुभाऊ कडू सांगतील तोच आदेश पाळणार असल्याचे प्रतिपादन प्रहारचे राज्य समन्वयक व बच्चुभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरव जाधव यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी यांची सातारा दूध संघ हॉल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अरविंद पिसे, शिवाजी चव्हाण, मनोज माळी, शुभम उबाळे, विजय मोरे, नंदकुमार पवार, आनंदा पोतेकर, भानुदास दांगडे, मनोज भैय्या माळी, प्रवीण शिंदे, बंटी भाऊ मोरे, समीना शेख, विद्या कारंडे, ऍड काजी इत्यादीसह पदाधिकारी उपस्थित होते.
गौरव जाधव म्हणाले, आमदार बच्चुभाऊ कडू महायुतीत आहेत. मात्र महायुतीकडून बच्चूभाऊ कडू यांना मिळणारे वागणूक आपल्याला माहिती आहे. तरी सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात पक्ष आदेश देतील त्याप्रमाणे काम करणार आहे. दिव्यांग कष्टकरी कामगार व युवकांसाठी काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे प्रहार जनशक्ती पक्षाची ताकद उभी करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यात एक लाखाहून अधिक दिव्यांग आहेत. हे सर्व दिव्यांग प्रहारशी निगडित आहेत. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते व दिव्यांग व त्यांचे कुटुंबीय आदेशाची वाट पाहत आहेत. प्रहार जर एखाद्या उमेदवाराला निवडून आणू शकतो तर गोरगरीब जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या उमेदवाराला पाडण्याची ताकद ही प्रहारमध्ये असल्याचे गौरव जाधव म्हणाले.