सातारा – पाऊस कमी झाल्याने उरमोडी धरणात नेहमीपेक्षा कमी पाणीसाठा झाला आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने उरमोडीचे सर्व पाणी दुष्काळी भागाला जाईल, सातारा तालुक्याला काहीच मिळणार नाही अशी भीती सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आहे. दुष्काळी माण, खटावसाठी असलेले पाणी त्यांना द्याच. पण, सातारा तालुक्यासाठी असलेले पाणी सातारा तालुक्यालाच द्यावे, अन्य कोठेही हे पाणी जाऊ नये याची खबरदारी घ्या, अशा सक्त सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कृष्णा खोरे विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे सातारा तालुक्यातील परळी ते काशीळ या भागातील शेतीसाठी उरमोडी धरणातून सातारा तालुक्यासाठी असणारे पाणी मिळाले पाहिजे. हे पाणी इतरत्र पळवू नये, अशी मागणी परळी ते काशीळ या भागातील शेतकऱ्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केली होती. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कृष्ण खोरे महामंडळाच्या कार्यालयात जाऊन अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांची भेट घेतली.
यावेळी संबंधित सर्व अधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती धर्मराज घोरपडे, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार आदी पदाधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते. सातारा तालुक्यासाठी 2.07 टी.एम.सी. पाणी वाटपाप्रमाणे आमच्या हक्काचे पाणी वितरीत करावे, कोल्हापूर पद्धतीचे सर्व बंधारे दुरुस्त करून पाणी गळती थांबवावी, पाणी वाटप कमिटी तयार करून त्यांच्या सूचनेनुसार पाणी द्यावे, वाढीव पाणीपट्टी आकारणी रद्द करावी, अशा मागण्या शेतकऱ्यांनी बैठकीत केल्या.
त्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, माण, खटाव साठीचे पाणी नियमानुसार त्यांनाच द्या पण, सातारा तालुक्यासाठीचे पाणी सातारा तालुक्यालाच द्या त्यात कोणतीही तडजोड करू नका. मोटारींचे बंद केलेले विद्युत कनेक्शन सुरु करा, बंधारे दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवा. त्याचवेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून बंधारे दुरुस्तीसाठी निधी देण्याची सूचना केली. त्याला संबंधित अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. बैठकीत रब्बी हंगामासाठी पाच आणि उन्हाळ्यासाठी पाच आवर्तने ठरवून देण्याचा निर्णय घेण्यात आला.