यशवंतनगर – कराड-मसूर मुख्य मार्गावरील रेल्वे गेट क्र 96 वर (एम.एच.-12-एफ.पी- 9132) ही चार चाकी कार रेल्वे रुळामध्ये अडकल्याने वाहतूक खोळंबली. आता रेल्वे आली तर काय होणार ? असा प्रश्न उपस्थित झाला. कार चालकाचीही तगमग वाढली. मात्र, नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत रुळात अडकलेली कार बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. सर्वांनीच निश्वास टाकला मात्र, या घडामोडीत वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या.
दुपारी दीडच्या सुमारास समोरून आलेल्या वाहनाला वाट देत असताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे पाठीमागील चाक रस्त्यावरून खाली घसरले व रेल्वे रुळात अडकले. त्यामुळे कार पुढे जाईना. कार चालक प्रयत्न करत होता. मात्र कार रुळातून निघत नव्हती. रेल्वे रुळात अडकलेली कार मग स्थानिक युवकांनी प्रसंगावधान राखून वेळीच बाजूला करत वाहतूक सुरळीत करून दिली. मात्र यादरम्यान झालेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे अनेक वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला मात्र यावेळी रेल्वे न आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, रेल्वे गेट 96 वर नेहमीच असे छोटे मोठे प्रसंग घडत असतात. यामध्ये बरेचदा वडाप धारकांची मनमानी कारणीभूत ठरते. फाटक लागलेले असताना वडाप चालक गाड्या पुढे काढण्याच्या नादात वाहतूक कोंडी निर्माण होण्यास कारणीभूत ठरत आहेत. यावर रेल्वे प्रशासनाने उपाययोजना राबवून सर्वसामान्य वाहनधारकांना होणारा नाहक त्रास कमी करावा अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.