सातारा – नवरात्र हा सृष्टीच्या सृजनाचा महोत्सव आहे. नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा स्त्री शक्तीचा जागर..! स्त्रीकडे असलेली नवनिर्मिती, सृजनशीलता ही मानवाला स्तिमीत करणारी शक्ती वाटत होती, म्हणून स्त्रीकडून होणारी नवनिर्मिती मानवाला वंदनीयही होती. स्त्रीच्या सृजनशक्तीचे मानवाला कुतुहुल होते आणि आदरही होता. नवरात्रीचा जागर हा स्त्रीशक्तीला केलेला सलाम आहे किंवा स्त्रीच्या नवनिर्मितीचा केलेला चिरंतन सन्मान आहे.
आपली भारतीय संस्कृती ही परंपरेने कृषी संस्कृती आहे. आपली एकूण जीवन पद्धती ही कृषी जीवनाशी संबंधित आहे. आपल्या सण- उत्सवांची रचना ही शेती संबंधित कामे व वर्षभरातील कालमान यावर आधारित आहे. नवरात्र हा कृषी संस्कृती संबंधीत महत्वाचा सण आहे. नवरात्र सणांमध्ये घटस्थापना महत्त्वाची आहे.
यामध्ये पत्रावळीवर माती पसरतात व त्यावर घटाची स्थापना करतात. घटाभोवती पसरली माती ही परिसरातील शेतीतील माती (वावरी) असते. पसरलेल्या मातीमध्ये मातीचा घट ठेवलेला असतो. त्यामध्ये पाणी भरलेले असते. ते पाणी घटातून पाझरत राहते. घटाभोवतालच्या मातीमध्ये धानं (परिसरातील धान्यांच्या बियां) असते. घटासमोर नंदादीप अखंडपणे तेवत असतो. ही मांडणी एका अर्थाने प्रयोगशाळेतील वातावरणाप्रमाणे मर्यादित वातावरणामध्ये बीज परीक्षणाची सोय करून ठेवली असते. दसऱ्यादिवशी नऊ दिवसांमध्ये उगवलेले धानं मिरवणुकीने सर्वत्र गावभर मिरवले जाते व मिरवणुकीद्वारे हे धान्य मोठ्या प्रमाणात उगवल्याची शेतकरी, गावकऱ्यांना द्वाही दिली जाते.
जणू मिरवणूकीद्वारे उगवलेल्या नवीन तृण धान्याचा हा जन्म सोहळा साजरा होत असतो. या अर्थाने दसरा हा सृष्टीजन्माचा अद्भुत सोहळा आहे. संजय सोनवणी म्हणतात – दसरा हा सृष्टीजन्माचा अद्भूत सोहळा आहे. कृषीवल संस्कृतीने प्राचीन काळी या उत्सवाची सुरुवात केली. जगन्माता नऊ महिने सृष्टीगर्भ धारण करुन दहाव्या महिन्यात सृष्टीचे सृजन करते ही मुलभूत कल्पना या सणामागे आहे. नवरात्रीचे नऊ दिवस हे नऊ महिन्यांचे प्रतीक बनतात. घटस्थापना ही सृष्टीगर्भाची शिव या चैतन्यातून झालेली विश्वनिर्मितीची सुरुवात असते. घट हे जगन्मातेच्या ओटीपोटाचे प्रतीकरुप आहे.
एका अर्थाने दसरा म्हणजे आपण सृष्टीचा जन्मसोहळा साजरा करत असतो. या उत्सवाची सुरुवात कल्पक हिंदू कृषीवल संस्कृतीने करणे स्वाभाविक आहे. वर्षाकाल सरत असता, सुगीचा हंगाम ओसरत असता, नवचैतन्याची चाहुल मानवी मनाला लागणे स्वाभाविक आहे. आदिशक्ती ही आपल्या पुर्वजांनी भुमीच्या रुपात पाहिली. तीच मानवी जीवनाची गंगोत्री, आधार आणि अंतिम विश्रामस्थळ. मानवी जीवनाचे सृष्टीनियमांवर आरोपन प्राचीन काळी मानवाने केले. त्याला एक उदात्त अर्थ दिला आणि आपल्या जीवनप्रवाहाला सृष्टीशी नाळ जुळवून घेणारी व्यापक दिशा दिली. पावसाळा संपला की, लष्करी मोहिमा सुरु होत. पावसाळ्यात सहसा युद्धे केली नसत. शेतकरी हेच सैनिक असल्याने पानकळ्यात त्यांना शेतीकडे लक्ष देणे भाग होते. हंगाम संपला की, मोहिमांत सामील होण्याचे आदेश येत. सीमोल्लंघन हा त्याचाच एक प्रतिकात्मक भाग या सृष्टीजन्माच्या सोहोळ्याशीही नंतर जोडला गेला आहे.
सृष्टीचा जन्म खरोखर कसा झाला याचा शोध विद्वान घेत राहीलच. पण कृतज्ञ कृषिवलांनी सृष्टीजन्माचे एक मिथक रचले आणि हजारो वर्ष श्रद्धेने ते जपले हे महत्वाचे आहे. एकूणच नवरात्र हा येथील कृषी संस्कृतीची निगडित महत्त्वाचा सण आहे. कृषी संस्कृतीतील दुसऱ्या हंगामासाठी पेरणी योग्य बिजांचे बीज परीक्षण करण्याची एक उत्तम व्यवस्था नवरात्राने केली आहे. त्याला परंपरेने धार्मिक अधिष्ठान लाभले आहे. ही व्यवस्था परंपरेने शेतकरी व एकूणच गाव व्यवस्थेस हितकारक व कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी उपकारक योजना आहे हे निश्चित..!
(क्रमशः)
राजेंद्र गुरव