शिवराज झगडे
जेजुरी – वर आभाळाचे छप्पर तर खाली धरतीमातेचा आसरा… कधी चटके बसतील असे उन्ह तर कधी मुसळधार पाऊस… वादळवाऱ्याशी झुंज देत या गावातून त्या गावात तर कधी घाटमाथा उतरून उत्तर कोकणात, मावळात… आपला पिढीजात-वाडवडिलांनी घालून दिलेला मेंढपाळाचा व्यवसाय सांभाळत… आपल्या दोन्ही मुलांना अभियांत्रिकीचे शिक्षण देणाऱ्या पांडुरंग सोमा माने, ताई पांडुरंग माने (रा. मूळ दौंडज, ता. पुरंदर) यांचा जीवन प्रवास हा दिशादर्शक आहे.
आपण-आपल्या वाडवडिलांनी जे भोगले ते मुलांच्या वाट्याला येऊ नये. त्यांनी शिकावे शहरात राहून साहेब व्हावे हे स्वप्न दोघा पतीपत्नीने ठेवले. थोरला मुलगा संजय याने पुणे येथे राहून भारती विद्यापीठातून मॅकेनिकल इंजिनिअरची पदवी मिळवली तर धाकटा शेखर याने एमआयटी कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरची पदवी प्राप्त करून घेतली आहे. सध्या दोन्ही मुले आपला पारंपरिक मेंढपाळाचा व्यवसाय सांभाळून आपल्या आईवडिलांना मदत करून नोकरीच्या शोधात आहेत.
पांडुरंग आणि ताई म्हणाल्या की, आमचा व्यवसाय मेंढपाळाचा 300 ते 400 बकऱ्या, पाच कुत्रे आणि संसाराला लागणारे साहित्य वाहून नेण्यासाठी दोन घोडे एवढा आमचा लवाजमा. या सर्व लवाजम्यासह या गावाहून त्या गावाला बकरी चारण्यासाठी जायचे उन्ह-वादळवारा, पाऊस यांच्याशी झुंज देत उघड्यावरचा आमचा संसार आणि दुष्काळ तर पुरंदरच्या पाचवीलाच पुजलेला. त्यामुळे वर्षातून 11 महिने तरी बाहेरच काढावे लागतात.
आम्ही जी वणवण करतोय ती मुलांच्या वाट्याला येऊ नये. म्हणून दोन्ही मुलांना शाळेत घातले. हातउसने करून कर्ज काढूनप्रसंगी उपासमार सहन करीत मुलांना शिक्षण दिले. मुळातच मुलांनाही कष्ट करण्याची सवय होती, त्यामुळे त्यांनीही जिद्दीने शिक्षणात प्रगती दाखवली. त्यांनी पुण्यात शिक्षण घेताना मिळेल “तेथे कमवा आणि शिका’, हे धोरण राबवले आणि ते यशस्वी झाले.
आई-वडिलांची वणवण थांबवायची
सुट्टीच्या दिवशी आम्ही दोघेही जेथे आमचे पाल असेल त्या गावी येऊन आईवडिलांना व्यवसायात मदत करतो, असे संजय व शेखर यांनी सांगितले. सध्या शिक्षण पूर्ण झाले असून नोकरीसाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील काळात नोकरी मिळाली की आईवडिलांची वणवण थांबवायची आहे; मात्र पिढीजात व्यवसाय हा ठाणबंद पद्धतीने गावाकडील शेतात करणार असल्याचे पांडुरंग माने यांच्या दोन्ही मुलांनी बोलून दाखवले.