आ. शिवेंद्रराजेंनी घेतली मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांची भेट; बोंडारवाडी धरणासाठीही प्रयत्न
सातारा – महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप झाल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा-जावळी मतदारसंघातील विकासकामांच्या मंजुरीसाठी तातडीने पाठपुरावा सुरू केला आहे. सातारा शहराची हद्दवाढ, जावळी तालुक्यातील महत्त्वाकांक्षी बोंडारवाडी धरण आणि जिल्ह्यासाठी सर्वांत महत्त्वाचे असलेले मेडिकल कॉलेज ही कामे मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची बुधवारी (दि. 8) भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
हे तिन्ही प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आ. शिवेंद्रराजेंनी सांगितले. राज्याच्या रखडलेल्या आणि चर्चेच्या ठरलेल्या खातेवाटपानंतर बुधवारी विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन झाले. या दरम्यान आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहराची हद्दवाढ, बोंडारवाडी धरण आणि मेडिकल कॉलेज या कामांसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना निवेदन देऊन आग्रही मागणी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सातारा शहराच्या हद्दवाढीच्या अनेक दिवसांपासूनच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत आ. शिवेंद्रराजेंनी चर्चा केली. शहराची हद्दवाढ झाल्यास लगतची उपनगरे आणि त्रिशंकू भागांच्या विकासाला चालना मिळणार आहे. सातारा शहर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा मिळण्यासाठी हद्दवाढीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करणे अत्यावश्यक आहे.
उपनगरांच्या विकासासाठी हद्दवाढ हाच एकमेव पर्याय असून सातारा पालिकेने याबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठवला होता. याबाबत आपण सातत्याने पाठपुरावा केला असून विधिमंडळात 29 फेब्रुवारी 2016 रोजी तारांकित प्रश्नही केला होता. नगरविकास विभागाने काढलेल्या सर्व त्रुटींची पूर्तता सातारा पालिकेने केली आहे. त्यामुळे या प्रस्तावाला तातडीने मंजूर द्यावी आणि सातारा शहराच्या सर्वांगीण विकासातील अडसर दूर करावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी निवेदनाद्वारे केली.
हद्दवाढीचा प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे आ. शिवेंद्रराजे यांनी सांगितले. हद्दवाढीबाबत आ. शिवेंद्रराजे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन दिले. त्यांनीही तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. जावळी तालुक्यातील 54 गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प आ. शिवेंद्रराजे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर करण्यात आला असला तरी जलसंपदा विभागाच्या सातारा कार्यालयाकडून ट्रायल पिट घेण्यास टाळाटाळ केली जात आहे.
या प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण होण्यासाठी ट्रायल पिट घेणे आवश्यक आहे. याबाबत बोंडारवाडी धरण कृती समितीने दि. 13 जानेवारी रोजी मेढा येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. ट्रायल पिट घेऊन बोंडारवाडी धरणाचे काम गतीने सुरू करावे, अशी मागणी आ. शिवेंद्रराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून हा प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी आ. शिवेंद्रराजे यांनी केली. याबाबत तातडीने बैठक बोलावून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दोन्ही मंत्र्यांनी दिल्याचे आ. शिवेंद्रराजे यांना सांगितले.
सातारा जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि बहुचर्चित सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न तातडीने सोडवावा, याबाबतही आ. शिवेंद्रराजे यांनी ना. अजित पवार व ना. जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. या महाविद्यालयाचा जागेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात तात्पुरत्या स्वरूपात मेडिकल कॉलेज सुरू करणे, त्यासाठी पदनिर्मिती, पदनिश्चिती आणि प्रवेश प्रक्रिया राबवण्यास मंजुरी मिळाली आहे. मात्र, गोरगरीबांना उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा पुरवणे आणि जिल्ह्यातील युवकांना दर्जेदार वैद्यकीय शिक्षणाची सोय उपलब्ध करण्यासाठी पूर्ण क्षमतेने मेडिकल कॉलेज सुरू होणे गरजेचे आहे.
त्यामुळे जागेचा प्रश्न निकाली काढून मेडिकल कॉलेज तातडीने उभारले जाणे आवश्यक आहे. आपण स्वत: लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आ. शिवेंद्रराजे यांनी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत, हाही प्रश्न लवकर सोडवण्याचे आश्वासन ना. अजित पवार यांनी दिले. या तिन्ही महत्त्वाच्या प्रश्नांसाठी आ. शिवेंद्रराजेंनी पुन्हा पाठपुरावा सुरू केला आहे. त्यांच्या मागण्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने हे प्रश्न लवकरच मार्गी लागतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.