विजय लाड
कोयनानगर – अल्पावधीतच पर्यटननगरी म्हणून नावारूपाला आलेल्या आणि लोकांचे आवडते वीकेंड डेस्टिनेशन बनलेल्या कोयनानगरच्या पर्यटनाला कोयना प्रकल्पाच्या अधिकारी वर्गाच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. त्यामुळेच 25 लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेले कारंजे फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच सुरू ठेवण्यात येत आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना पर्यटन विकास निधीतून दिलेले 25 लाख रुपये खर्च करून कोयनानगर येथे हे कारंजे उभारण्यात आले आहे. मात्र, हे कारंजे वर्षभरात केवळ दोन दिवस आणि तेही काही काही तासांसाठी सुरू ठेवले जात आहे.
त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे शासनाने कोयना पर्यटन विकास आराखडा मंजूर करून 20 कोटी रुपयांचा निधी दिला. देसाई यांच्या संकल्पनेतून कोयनेत सुशोभिकरण सुरू आहे. गतवर्षी हे कारंजे उभारण्यात आले. कोयनानगर सुशोभिकरणाचे शंभूराज देसाई यांचे स्वप्न असले तरी अधिकार्यांच्या उदासीनतेमुळे हा परिसर अस्वच्छ होत आहे. याबाबत कोयनावासीय व पर्यटक नाराजी व्यक्त करत आहे.