पुणे – पीएमआरडीएकडून आचार्य आनंद ऋषीजी चौक ( सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात) मेट्रो-३ प्रकल्पासाठीचा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. त्यासाठी सिमला आॉफिस ते विद्यापीठ चौकापर्यंत हा रस्ता ४५ मीटर रूंद केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी काढण्यात येणारे झाडे तोडण्यास मनाई करत उच्च न्यायालयाने झाडे तोडावी लागू नयेत आणि प्रकल्पही मार्गी लागावेत, यासाठी सर्वोत्तम पर्याय सुचविण्यासाठी न्यायालयानेच सहा सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.
या समितीची पहिली बैठक गुरूवारी आॅनलाइन पार पडली. यावेळी समिती सदस्यांना महापालिकेकडून प्रकल्प तसेच वृक्षतोड आणि न्यायालयाच्या निर्णयाची प्राथमिक माहिती सादरीकरणासह देण्यात आली आहे. दरम्यान, येत्या ५ फेब्रुवारी रोजी ही समिती प्रत्यक्ष या रस्त्याची पहाणी करणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. न्यायालयाच्या सूचनेनुसार या समितीने २८ फेब्रुवारी पर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना न्यालयाने केल्या आहेत
हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पासाठी तसेच या प्रकल्पासाठीच आनंदऋषीजी चौकात उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपुलासाठी गणेशखिंड रस्ता ३६ मीटरवरून ४५ मीटर रूंद करण्यात येणार आहे. यासाठी येथील १९२ वृक्ष तोडण्यात येणार आहेत. याविरोधात परिसर या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
त्यावर झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय रस्ते वाहतूक संशोधन संस्थेच्या संचालकांनी नियुक्त केलेला प्रतिनिधी, मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख अथवा संस्थेने नेमलेला एखादा विभागप्रमुख. नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या संचालकांनी नेमलेला प्रतिनिधी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त तसेच आयआयटी मुंबईच्या संचालकांनी नेमलेला व त्यांच्या शहरी अभ्यास विभागातील नगरनियोजन तज्ज्ञ यांचा या समिती नेमण्याचे आदेश दिले होते.
वाहतूक कोंडी फुटेना
या चौकात उड्डाणपूलाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, त्याच वेळी रस्ता रूंदीकरण झालेले नसल्याने या रस्त्यावर दिवसभर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. प्रत्यक्षात, काम सुरू होताना प्रशासनाकडून पर्यायी रस्ते उपलब्ध करून देणे तसेच वाहतूक नियमन करणे आवश्यक होते. मात्र, न्यायालयाच्या सूचनेचे कारण देत त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने या रस्त्यावर कोंडी होत असून, त्याचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसत आहे.