वाई (प्रतिनिधी) – आरक्षणासह मराठा समाजाच्या अनेक ज्वलंत प्रश्नांकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांची सभा वाई येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवार, दि. 18 रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे. या सभेला वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील सर्व गावांमधील मराठा समाज बहुसंख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा वाई तालुका समन्वय समितीच्या सदस्यांनी सोमवारी दिली.
या सभेच्या नियोजनासाठी मराठा क्रांती मोर्चाची बैठक वाई येथे झाली. यावेळी समन्वय समितीचे सदस्य म्हणाले, देशाच्या इतिहासात मराठ्यांच्या शौर्यगाथा सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेल्या आहेत. अनेक महान मराठा योद्ध्यांनी बलिदान देऊन महाराष्ट्र उभा केला आहे. मराठा समाजाच्या मतांची भीक घेऊन सरकार स्थापन करण्यात येते, त्याच मराठा समाजाला हक्काच्या आरक्षणासाठी सरकार दरबारी अक्षरशः भीक मागवी लागत आहे, ही शोकांतिका आहे. समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असून, सद्य स्थितीत शेतीची दुरवस्था झाली आहे. हा व्यवसाय आतबट्ट्याचा ठरला आहे. राजेशाहीच्या काळात स्वाभिमानी असलेला मराठा समाज, लोकशाहीत उपेक्षित राहिला आहे.
लोकशाहीत भांडवलदार बोकाळले. गरीब मराठा नोकरी, व्यवसाय न करता शेतीतच अडकून पडला. बहुसंख्येने असलेल मराठा समाजाचा स्वतःचा पक्ष वा नेता नाही. जे नेते आहेत ते स्वार्थाने ग्रासल्याने समाजाचे प्रश्न मांडत नाही. या परिस्थितीत आरक्षणाशिवाय बदल होणार नाही, अशी समाजाची पक्की धारणा झाली आहे.
जरांगे-पाटील यांच्या पाठीशी ठाम राहून, मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण घ्यायचेच. जरांगे-पाटील यांच्या सभेत जास्तीत जास्त लोकांची बैठक व्यवस्था, माध्यम प्रतिनिधींसाठी वेगळे व्यासपीठ, रुग्णवाहिका, पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन, वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. गावागावात बैठका घेऊन सर्वांना सभेला येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.