लेखक कृष्णात खोत; गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचे उदघाटन
राजर्षी शाहू महाराज साहित्य नगरी : भवतालातील स्पंदने साहित्यिकाने टिपलीच पाहिजेत. कस्पटदेखील साहित्यिकाला वर्ज्य असता कामा नये. लेखकाच्या दृष्टीने मुंगीसुद्धा महत्वाची असली पाहिजे. त्यातूनच साहित्य अधिक वास्तववादी होईल, असा आशावाद साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक कृष्णात खोत यांनी व्यक्त केला.
राजवीर पब्लिक स्कूल (वाशी, ता. करवीर) व गुंफण अकादमी (मसूर, ता. कराड) यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथे राजवीर पब्लिक स्कूलच्या प्रांगणात आयोजित एकोणिसाव्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने संमेलनाचे अध्यक्ष होते. व्यासपीठावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष बी. ए. पाटील, अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक सलीम मुल्ला, प्राचार्य डॉ. जे. के. पवार, प्रसिद्ध ग्रामीण कथाकार बबन पोतदार, प्राचार्य राजेखान शानेदिवाण, भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन प्रा. शिवाजीराव पाटील, मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, प्रा. चंद्रकांत पोतदार, गोवा मराठी अकादमीच्या सासष्टी विभागाचे अध्यक्ष अरुण रायकर, अनिता पाटील, वैष्णवी सरनोबत उपस्थित होते.
लेखकाने राज्यकर्त्यांच्या तसेच सत्तेच्या नव्हे तर सत्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. त्यांनी केवळ रोमँटिक लिहू नये, तर समाज परिवर्तनाबाबत लेखन करावे. भोंगळ व्यवस्थेमुळे शिक्षणाचा दर्जा खालावत चालला असून न शिकलेल्या माणसाला मरू देऊ नका, असे मौलिक विचार कृष्णात खोत यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
समतोल विचार साहित्यातून रुजावेत
जातीपाती, धर्माच्या पलिकडचा माणूस साहित्याने जगवला पाहिजे. तशा लिखाणाची भूमिका साहित्यिकांनी घेतली पाहिजे. डावे-उजवे, पुरोगामी – प्रतिगामी याच्यापेक्षा ज्यात मानवता आहे, जे माणसाच्या सुखदुःखाशी समांतर जाणारे आहे, त्याला समजून घेणारे आहे, त्याच्या आयुष्याची प्रकाशवाट उजळ करणारे आहे असा समतोल विचार जागर करणारे आणि माणसाच्या मनात सद्भावना निर्माण करणारे साहित्य सातत्याने निर्माण करण्याची गरज असल्याचे मत संमेलनाध्यक्ष डॉ. राजेंद्र माने यांनी यावेळी व्यक्त केले.
या साहित्य संमेलनातून अनेक नव्या लेखक व कवींना उमेद मिळेल. विद्यार्थ्यांमधून लेखक कवी निर्माण होतील असा विश्वास स्वागताध्यक्ष बी. ए. पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केला. साहित्याची नव्या पिढीशी नाळ जुळावी, नवोदितांना संधी व हक्काचे व्यासपीठ मिळावे त्याचप्रमाणे वाचक चळवळ गतिमान व्हावी हा या संमेलनाच्या आयोजनामागचा हेतू असल्याचे डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
अभूतपूर्व उत्साहात ग्रंथदिंडी
सकाळी वाशीतील बिरदेव मंदिरापासून मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत लेझीम पथके, भजनी मंडळे, संत व सुधारकांच्या वेशातील विद्यार्थी, डोक्यावर मंगलकलश घेतलेल्या सुहासिनी यांचा मोठा सहभाग होता. त्याचप्रमाणे राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेतील कलावंतांचा चित्ररथ तर सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. हलगी आणि लेझीमाच्या ठेक्यावर आणि टाळ मृदंगाच्या गजरात निघालेल्या या ग्रंथदिंडीत अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. ग्रंथदिंडीत अबालवृद्ध प्रचंड उत्साहात सहभागी झाले होते.