माधव विद्वांस
स्वातंत्र्यसैनिक, लेखिका, कवयित्री, संशोधक, संकलक डॉ. सरोजिनी बाबर यांची आज जयंती. त्यांचा जन्म 7 जानेवारी 1920 रोजी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील बागणी गावी झाला. त्या आक्का नावानेच सर्वपरिचित होत्या. “रानजाई’ या दूरदर्शनवरील मालिकेने शांता शेळके यांच्यासह सरोजिनी बाबर यांनी महाराष्ट्राच्या घराघरात स्थान मिळवले होते. या मालिकेतून मराठी संस्कृतीचे वास्तव दर्शन त्यांनी घडविले. यातील सर्व भागांचे लेखन तर त्यांनी केलेच शिवाय अनेक मराठी गाण्यांचे, नृत्यांचे, रिवाजांचे चित्रण प्रभावीपणे केले.
त्यांचे वडील कृष्णराव बाबर हे शिक्षण खात्यात नोकरीला होते. नोकरी फिरतीची होती. त्यामुळे त्यांचे शिक्षण एका ठिकाणी न होता, इस्लामपूर, सातारा, अहमदनगर, पुणे अशा वेगवेगळ्या शहरांमधून झाले. 1940 साली शालांत परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाकरिता पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्रवेश घेतला.वर्ष 1944 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए व पीएच. डी. पदव्याही मिळवल्या. पीएच. डी. ही पदवी प्राप्त करणाऱ्या त्या काळात मराठा समाजातील पहिल्या महिला होत.
त्यांची भाषाशैली सोपी, सहज समजणारी आणि प्रत्यक्ष संवाद घडविणारी अशी होती. “महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील ओव्या, गीते, कथा, म्हणी, उखाणे असा लोकवाङ्मयाचा अफाट संग्रह असलेल्या सरोजिनी अक्का म्हणजे सरस्वतीची लाडकी लेकच’, अशा शब्दांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांचे कौतुक केले. ते त्यांना थोरली बहीण असा उल्लेख करीत. ताईंच्या साहित्य संपदेमध्ये 7 कादंबऱ्या, 11 कथासंग्रह, 26 ललितलेखसंग्रह, 2 कवितासंग्रह आणि 4 नाट्यवाङ्मयाची पुस्तके आणि आत्मचरित्र अशी 51 स्वतंत्र पुस्तके व त्यांच्या 307 संपादित पुस्तकांच्यासह त्यांच्या ग्रंथांची एकूण संख्या 358 आहे.
समाज-शिक्षण माला हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांचाही मोठा सहभाग होता. त्यामध्ये स्वतः सरोजिनी बाबर, वडील कृ. भा. बाबर त्यांच्या दोघी धाकट्या भगिनी- कुमुदिनी पवार व शरदिनी मोहिते यांचा मोठा सहभाग होता. तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई व मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सूचनेवरून त्यांनी पहिले लोकसाहित्यविषयक संमेलन भरवले.
त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग घेतला होता. सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (1952-57), महाराष्ट्र विधानपरिषद (1964-66) व राज्यसभा (1968-1974) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. आकाशवाणीच्या पुणे केंद्राची सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, नामदेव गाथा संशोधन समिती, नाट्य परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड) अशा अनेक संस्थांमध्ये काम केले. 19 एप्रिल 2008 रोजी दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.