रवींद्र खंदारे
‘आले आले नवीन वर्ष, नवा दाटला मनी हर्ष,
करू या संकल्प नवा, पूर्वीपेक्षा वेगळा हवा.’
आज 31 डिसेंबर- ग्रेगरियन (इंग्रजी) वर्षातील शेवटचा दिवस. उद्या एक जानेवारी- नवीन वर्षातील पहिला दिवस. नवीन वर्षात 1 जानेवारीला एक वेगळे कार्य करण्याचा संकल्प बरेच जण करतात. मोठ्या उत्साहाने 1 जानेवारीपासून काय नवीन करायचे याचा संकल्प मांडतात. म्हणजेच मनोमन नवीन काहीतरी चांगले करण्याचे ठरवले जाते. नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे हा सोडलेला संकल्पही फार थोडा दिवस टिकतो आणि हळूहळू संकल्पापासून आपण दूर जाऊ लागतो.
या दृष्टीने विचार केला तर आपण आरंभशूर ठरतो. आरंभशूर म्हणजे एखाद्या कामाची सुरुवात धुमधडाक्यात, वाजत गाजत करून ते पूर्ण न करताच मध्ये सोडून देणे. कोणत्याही कामाची सुरुवातच करण्यात फक्त शूर म्हणजेच आरंभशूर. नवीन वर्षाचे स्वागत करताना संकल्प करून तो पूर्ण न करता मध्येच सोडून दिल्याने आपणही आरंभशूर ठरतो. बरे संकल्प तरी काय करतात? दररोज दैनंदिनी लिहिणे, व्यसन (असलेच तर) सोडणे, वाचन करणे, पुस्तक लेखन करणे, व्यायाम करणे, नवीन अभ्यासक्रम शिकणे, दररोज सायकल चालवणे, अर्धा तास धावणे, जिममध्ये व्यायामासाठी जाणे, वर्षभरात एक तरी परदेशी अगर देशात ट्रिप करणे, कोणाचे मन न दुखवता बोलणे, स्पर्धेत सहभाग घेणे यासारख्या इतर अनेक प्रकारचे संकल्प केले जातात.
फोर्ब्स हेल्थ ने नवीन वर्षानिमित्त व्यक्ती करत असलेल्या संकल्पाचा अभ्यास करून त्याचे विश्लेषण सांगितले आहे. 1000 अमेरिकी नागरिकांचा समावेश या सर्व्हेमध्ये केला होता. 62 टक्के लोकांवर नवीन वर्षाच्या संकल्पाचा दबाव येतो असे सांगतात. तर 48 टक्क व्यक्ती शारीरिक सदृढतेला प्राधान्य देण्याचा संकल्प करतात. 36 टक्के लोकांनी आपले मानसिक स्वास्थ्य सुधारण्याचा संकल्प केला तर 55 टक्के लोकांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे तेवढेच महत्त्वाचे आहे असे वाटते. 49 टक्के लोक आपला संकल्प पूर्ण करण्याचा अलर्ट देणाऱया ॲपला महत्त्व देतात. या ॲपमध्ये डाएट प्रोग्रॅम, जिम मेंबरशिप, हॅबिट ट्रेकिंग, कॅलरी काउंटर आणि मेडिटेशन यांचा समावेश आहे.
या पाहणीमध्ये सर्वात जास्त केल्या जाणाऱ्या संकल्पाची वर्गवारी जाहीर केलेली आहे. शरीर सुदृढता सुधारण्याचा संकल्प 48 टक्के, वित्तीय सुधारणा 38 टक्के, मानसिक स्वास्थ्य सुधारणा 36 टक्के, वजन कमी करण्याचा संकल्प 34 टक्के व्यक्ती करतात तर आहारामध्ये सुधारणा करण्याचा संकल्प 32 टक्के व्यक्ती करतात. केलेले संकल्प किती दिवस टिकतात? याचाही अभ्यास केला आहे. फक्त 1 टक्के लोकांचा संकल्प वर्षभर टिकतो तर सर्वाधिक 22 टक्के लोकांचा संकल्प दोन किंवा तीन महिनेच टिकतो. एक महिन्याच्या आतच आपला संकल्प सिद्धीचे प्रयत्न सोडून देणारे एक टक्के आहेत तर आठ टक्के लोक एक महिन्यानंतर प्रयत्न करणे थांबवतात.
आपण केलेले संकल्प सिध्दीस जाण्यासाठी आपल्या अंगी असावी लागते. जिद्द, चिकाटी, सातत्य आणि संयम. हे चारही गुण ज्याच्या अंगी आहेत त्या व्यक्तींचा संकल्प सिद्धीस जातो अन्यथा तो व्यक्ती ठरतो फक्त आरंभशूर. जिद्द म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी धरलेला आग्रह, हट्ट. एखादी गोष्ट मिळविण्यासाठी केलेला अविरत पाठलाग म्हणजेच जिद्द. जी व्यक्ती जिद्दी म्हणजेच हट्ट धरणारी, आग्रह धरणारी असते ती व्यक्ती आपला संकल्प सिद्धीस नेण्याची क्षमता त्याच्या अंगी असते. ज्याला यशस्वी व्हायचे आहे त्याने आपला मार्ग निवडावा. निवडलेल्या मार्गाने यश प्राप्त झाले नाही तर मार्ग बदलून प्रयत्न केला तरी यश मिळते. मात्र, तोपर्यंत प्रयत्न करत रहावे, जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही. तोपर्यंत मार्ग बदलून बदलून प्रयत्न केला आणि यश प्राप्त झाले म्हणजे यश प्राप्तीसाठी जिद्द महत्त्वाची आहे. संकल्प सिद्धीसाठी सुद्धा अशी जिद्द प्रत्येकाने अंगी बांधली पाहिजे.
जिद्दीप्रमाणेच सातत्य ही यशासाठी महत्त्वाचा आवश्यक गुण आहे. व्यक्तीच्या अंगी फक्त जिद्दच असून उपयोग नाही तर प्रयत्नांमध्ये सातत्य असणे महत्त्वाचे आहे. पाण्याचा एक एक थेंब सतत एका दगडावर पडला तर काही दिवसांनी त्या दगडावर खोलगट भाग तयार होतो, कालांतराने त्या दगडाला छिद्रही पडते. पाण्याच्या पडलेल्या थेंबांमध्ये सातत्य असते त्यामुळे दगडाला ही भेदले जाते. कोणत्याही कामात सातत्य असेल तर ती कामे यशस्वीपणे पूर्ण होणारच. प्रयत्नांमध्ये सातत्य राहिल्याने अत्यंत अवघड, अशक्य कामेही शक्य होऊन जातात. म्हणूनच सातत्यपूर्ण प्रयत्न केले तरच यशसिद्धी प्राप्त होते. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, तेलही गळे’ या म्हणीप्रमाणे प्रयत्नांमध्ये सातत्य असेल तर दगडालाही पाझर फुटू शकतो.
सातत्यपूर्ण प्रयत्न करत असताना अंगी हवी असते ती चिकाटी. एखादी गोष्ट दीर्घकाळ करत राहणे याला चिकाटी म्हणतात. यश मिळण्यासाठी प्रयत्नांमध्ये सातत्य हवे. प्रयत्न मध्येच सोडून दिल्याने यश मिळत नाही त्यामुळे व्यक्तीच्या अंगी चिकाटी असणे महत्वाचे आहे. सर्जनशील कार्य करणारे कलाकार, साहित्यिक यांच्याकडे चिकाटी असते. या तीन गोष्टींच्या बरोबरच महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे संयम. यश मिळेपर्यंत थांबण्याची सहनशीलता व्यक्तीच्या अंगी असायला हवी. संयम ठेवल्याचा चांगला परिणाम होतो आणि तुम्ही केलेला संकल्प सिद्धीस जातो.
हे चारही गुण आपल्या अंगी बाणल्याने आपण केलेले सर्व संकल्प सिद्धीस जातील यात काही शंका नाही. चला, तर संकल्प करूया, फक्त आरंभशूर न ठरता यशस्वी व्यक्तिमत्व बनविण्याचा. नवीन वर्षाच्या नवीन संकल्पासाठी आपणासही हार्दिक शुभेच्छा.