मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती.त्यांची कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून त्यांना जमीन मिळणार कि पुन्हा एकदा कोठडीत रवानगी होणार याचा फैसला होणार आहे. दरम्यान, ईडी राऊत यांची कोठडी वाढवून मिळावी, यासाठी मागणी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ईडीने आठ दिवसांची कोठडी मागितली होती, पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद करताना राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केले आहे, आठ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय? असा सवालही उपस्थित केला. त्यावर न्यायालयाने ईडीची विनंती अमान्य करत त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. ईडी आज पुन्हा एकदा कोठडी वाढवून मिळावी, यासाठी मागणी करणार आहे
पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले संजय राऊत यांची ईडी कोठडी 4 ऑगस्ट रोजी संपत आहे. ईडीने राऊतांना 31 जुलैला रात्री उशिरा भांडुपच्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली होती. या प्रकरणी ईडीने असा दावा केला होता की, संजय राऊत यांचा संबंध असून प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून संजय राऊत यांनी पैसा मिळवला. प्रवीण राऊत फक्त मोहरा होते, खरे सूत्रधार संजय राऊत हेच होते, आमच्याकडे याचे पुरावे आहेत. तसेच राऊतांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचं ईडीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
संजय राऊत यांना जर जामीन मिळाला तर ते पुन्हा धमकाविण्याचं किंवा त्यापुढे जाऊन कृत्य करु शकतात, तसेच राऊत यांचे परदेश दौरे बिझनेसमन आणि विविध लोकांकडून पुरस्कृत केले जातात, याचं नेमकं कारण काय? असा सवाल करत प्रवीण राऊत हे संजय राऊतांना दर महिन्याला दोन लाख देत होते, ते कशासाठी? असा सवालही ईडीने उपस्थित केला आहे. तसेच संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने केला.