मुंबई – ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना काल न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर त्यांचे मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले. सर्व शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत राऊत यांचे स्वागत केले. त्यानंतर आज पहिल्यांदाच राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. माझ्या परिवाराने खूप काही भोगले आहे. असे राजकारण देशात या आधी पाहिले नसल्याचे राऊत यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रात नवीन सरकार बनले आहे. यादरम्यान सरकारने काही निर्णय चांगले घेतले आहेत. म्हाडाला घर देण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीसांनी घेतले हे चांगले निर्णय आहेत असं राऊत यावेळी म्हणाले. जेलमध्ये असताना मी विचार करत होतो,वीर सावरकर १० वर्षांहून अधिक काळ जेलमध्ये कसे राहिले,लोकमान्य टिळक मंडालेमध्ये सहा वर्षाहून अधिक काळ कसे राहिले तसेच आणीबाणीच्या काळात अटल बिहारींसोबत इतर नेते जेलमध्ये कसे राहिले असतील राजकारणी व्यक्तीला कधी ना कधी जेलमध्ये जावेच लागते म्हणून मी जेलमध्ये गेलो असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.
राज ठाकरेंच्या टीकेला दिले उत्तर
संजय राऊतांना ईडीकडून अटक होईल आता त्यांनी एकांतात स्वतःशीच बोलण्याची प्रॅक्टिस करावी अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राऊतांवर केली होती. त्याला आता राऊत यांनी उत्तर दिलाय ते म्हणाले, हो मला ईडीने अटक केली ती बेकायदेशीर होती असं कोर्टाचं म्हणणं आहे. परंतु राजकारणामध्ये शत्रूच्याबाबत देखील अशी भावना व्यक्त करू नये की तो जेलमध्ये जावा. जसे सावरकर एकांतात होते,लोकमान्य टिळक एकांतात होते.. आणीबाणीच्या काळात जेलमध्ये गेलेले राजकरणी एकांतात होते तशी माझीही अटक राजकीय होती आणि मी देखील माझा काळ सत्कर्मी लावला असल्याचे स्पष्ट मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.