मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. सोमय्यांच्या हल्ल्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांनी सॉस लावून जखम तयार केली असल्याचा आरोप केला तर आता त्यांच्या याच टीकेला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उत्तर दिले आहे.
आज खार पोलीस स्टेशनमध्ये किरीट सोमय्या यांनी हजर होत मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सोमय्या यांनी,”पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर खोटी असल्याचे सांगत याविरोधात तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या खार पोलीस स्थानकात पोहोचले. ‘त्या एफआयआरवर मी सही केलेली नाही. त्या एफआयआरवरील सही बनावट असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. राज्य सरकारने बनावट एफआयआर दाखल केली असून सरकारची बनवाबनवी पकडली गेली आहे’, असेही सोमय्या म्हणाले आहेत.
यावेळी किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दाखल करण्यात आलेली एफआयआर चुकीची असून त्यावर माझी स्वाक्षरी नाही, पोलीस आयुक्तांनी माझी खोटी सही केली का असा प्रश्न सोमय्या यांनी यावेळी विचारला आहे. याविरोधात आपण खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे. माझ्या नावावने बोगस एफआयआर दाखल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली आहे.
पुढे बोलताना सोमय्यांनी उद्धव ठाकरेंच्या माफीया सेनेने आपली हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे “उद्धव ठाकरेंच्या माफिया सेनेनं खार पोलीस स्थानकाच्या हद्दीत किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. सगळं लाइव्ह दाखवण्यात आलंय. तिसऱ्यांदा हत्या करण्याचा प्रयत्न कशासाठी केला गेला. कारण माफिया सेनेचे जितके काही छोटे-मोठे सरदार आहेत सगळ्यांचे घोटाळे बाहेर आले. अनेकांच्या प्रॉपर्टी जप्त झाल्या. अनेकांना अटक झाली, अनेक जेलमध्ये आहेत, अनेक रुग्णालयात आहेत. अमुक जामीनावर आहे. म्हणून ठाकरे सरकार कापायला लागलीय. म्हणून मनसुख हिरेननंतर किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला.पण किरीट सोमय्याच्या पाठीशी महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेचं प्रेम आहे. उसका बाल भी बाका नही होगा,” असे सोमय्या म्हणाले.