मुंबई ( Mahavikas Aghadi Morcha )- महाविकास आघाडीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजप नेत्यांकडून महापुरुषांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात आज महामोर्चा काढला. महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांसह अनेक छोट्या – मोठ्या पक्षांचे नेते या मोर्चात सहभागी झाले होते. शिवसेनेची तोफ म्हणून लौकिक असलेल्या संजय राऊत यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिंदे – फडणवीस सरकारच्या भवितव्याबाबत भाकीत केलं आहे.
यावेळी बोलताना राऊत यांनी, शिंदे फडणवीस सरकार फेब्रुवारी महिनाही बघणार नाही असं भाकीत केलं. “आजच्या महाविकास आघाडीच्या विराट मोर्चाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदच्युत केलं आहे. राज्यपालांना पदच्युत करणारा हा विराट मोर्चा आहे. शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा इशारा या मोर्चाने दिला आहे.” असं राऊत म्हणालेत.
राऊत यांनी यावेळी, “महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा अपमान करून कुणी सत्तेत बसू शकेल का? एक मिनिटही त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही. म्हणून हे सरकार उलथून टाकण्यासाठी हा इशारा आहे. महाराष्ट्राची ताकद काय आहे? हे आज दिल्लीसुद्धा दुर्बिणीतून बघत असेल. आज महाराष्ट्र जागा झालाय. आज महाराष्ट्र पेटलाय, ही ठिणगी पडली आहे. या व्यासपीठावर महाराष्ट्रातला प्रत्येक नेता आहे.” अशा शब्दांमध्ये हल्लाबोल केला. ( Mahavikas Aghadi Morcha )
दरम्यान, एकीकडे महाविकास आघाडीचा महामोर्चा सुरु असतानाच पुण्यामध्ये वारकऱ्यांनी सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अंधारे यांनी केलेल्या एका जुन्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा वाद पेटला आहे. आंदोलक वारकऱ्यांनी आज अंधारे यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. तसेच लवकरच महाराष्ट्र बंदची हाक देणार असल्याचे देखील म्हंटले आहे.