मुंबई – राज्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप पक्षाच्या काही नेत्यांकडून महापुरुषांबाबतच्या करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी या मुद्द्याला धरून आज मुंबईमध्ये विराट मोर्चा पुकारला. या मोर्चाला लिकांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. या मोर्चासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महत्वाची भूमिका आहे. त्याचबरोबर इतर काही पक्ष आणि संघटना देखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे दिसत आहे. यावेळी या मोर्चाला संबोधित करताना राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.
‘मविआच्या’ हल्लाबोल मोर्चात उद्धव ठाकरे कडाडले; शिंदे सरकारवर साधला निशाणा
यावेळी बोलताना अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले की,”गेले सहा महिने राज्यात जे सरकार सत्तेत आले त्यामुळे दुर्दैवाने राज्याच्या मातीला फुटीचा, गद्दारीचे संकट जेव्हा महाराष्ट्रावर येते तेव्हा राज्याचा स्वाभिमान आणि अस्मितेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठतो आणि आपले ध्येय साध्य केल्याशिवाय राज्य शांत बसत नाही याची साक्ष देणारा हा मोर्चा आहे. खरतर ही वेळ राज्यावर का आली तर महापुरुषांविषयी अपमानास्पद वक्तव्य सातत्याने होत आहेत त्याला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढावा लागला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, मौलाना आझाद अशा अनेक महापुरूषांची नावांची यादी आहे, ज्यांच्याबद्दल गरळ ओकण्याचे काम, बेताल वक्तव्य करण्याचे काम कशामुळे सुरू आह? यामागील मास्टमाईंड कोण आहे? हे का थांबत नाही?,” असे अनेक सवाल अजित पवार यांनी राज्य सरकारला केले.
पुढे अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले की, “माणसाकडून चूक एकदा होऊ शकते, चूक झाल्यास माफी मागतो ही राज्याची संस्कृती आहे परंतु सत्ताधाऱ्यांमध्ये तसे घडत नाही. राज्यपाल काही बोलले की त्यांच्यापुढे त्यांचे मंत्री बेताल वक्तव्य करतात, अशा लोकांना जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी, असे शब्दात अजितदादांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. तुम्ही राज्यकर्ते म्हणून बसले असताना संविधान, कायदा काय सांगतो हे पाहणे जरूरीचे असताना या सगळ्याचा विसर राज्यकर्त्यांना पडला आहे, असा आरोप त्यांनी केला. या सर्व विरोधात जितक्या मोठ्या संख्येने राज्यातील जनसमुदाय इथे अवतरला आहे त्यातून राज्यकर्त्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही”, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.
तसेच यावेळी महापुरुषांचा होणार अपमान पाहाता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना हटवले पाहिजे, या सोबत जे आमदार दोषी असतील त्यांनाही हटवले पाहिजे अशी मागणी अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी केले. ही सर्व प्रवृत्तीची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी उद्याच्या अधिवेशनात वेळ पडल्यास कडक कायदा करावा अशी मागणी त्यांनी केली. अशाप्रकारच्या बिलाला आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील असेही ते म्हणाले.
“बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागातील ८६५ मराठी गावे राज्यात आणण्याचा संघर्ष सुरू असताना राज्यातील गाव कर्नाटकात जाण्यास का सुरुवात झाली याचा राज्यातील नागरिकांनी विचार करायला हवा. आम्ही सत्तेत असताना अशा पद्धतीने कधीही भूमिका सीमाभागातील गावांनी घेतली नाही. देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र पूर्णपणे वेगळा आहे त्यामुळे हे का घडले आणि कुणामुळे घडले याची स्पष्टता व्हायला हवी”, असे अजित पवार ( Ajit Pawar ) म्हणाले.
“शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटक बँकेत सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची भूमिका घेतात यावर अजितदादांनी राज्य सरकारला धारेवर धरले. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राबद्दल अनेक वक्तव्य केली त्यावर राज्य सरकारला काही वाटायला हवे, कर्नाटक सरकार सातत्याने आपल्यावर अन्याय करतेय. तुमचे पुतण्या मावशीचे प्रेम हे सगळ्यांना कळाले आहे, अशी टीका अजितदादांनी केली.
आपल्याला इथेच थांबून चालणार नाही तर या सत्ताधाऱ्यांकडून सतत होणाऱ्या चुकीच्या निर्णयातून या सरकारला त्यांची जागा दाखवण्याचे काम आपल्याला करायचे आहे”, असे आवाहन यावेळी अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी केले.