मुंबई – दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलक आणि सरकारमधील सलग आठवी बैठक निष्फळ ठरली आहे. नवे कृषी कायदे रद्द केले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
स्वातंत्र्याचे हवन परकीयांकडूच होते असे नाही. स्वातंत्र्यासाठी घामही न गाळणारे राज्यकर्ते म्हणून येतात तेव्हा ते स्वातंत्र्यावरच सगळ्यात निर्घृण हल्ला करतात. आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी 83 वर्षांचे रतन टाटा मुंबईहून पुण्यास पोहोचले, पण दिल्लीचे राज्यकर्ते शहराच्या सीमेवरील शेतकऱ्यांच्या भेटायला जात नाहीत. बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्यांनी देश खराब केला, दुसरे काय?, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे.
सध्या आपल्या देशात नक्की काय सुरु आहे हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही. आपले प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करोना संसर्गाच्या दहशतीमुळे वर्षभर परदेशात गेले नाहीत. ते देशातच आहेत, पण जनतेचे किती प्रश्न या काळात सुटले? ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन हे करोनाचा नवा स्टेन्स घेऊन 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात अवतरणार होते. पण इंग्रज जात्याच शहाणे असल्याने जॉन्सन साहेबांनी आता दिल्लीस येण्यास नकार दिला.
वर्षभरापूर्वी ट्रम्प हे अहमदाबादेत “नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमासाठी अवतरले. तेव्हा 50 लाख लोकांनी स्वागत केले. ट्रम्प व त्यांच्या भोवती असलेल्या अमेरिकेन मंडळींनी करोनाचा प्रसार केला आणि निघून गेले. ते प्रे. ट्रम्प आता सत्ता गमावून बसले आहेत, असा टोलाही त्यांनी लगाविला.
ही एकप्रकारे आणीबाणीच
आज देश व राजकारण एका व्यक्तीभोवती फिरत आहे. लोकसभेचे तरी सार्वभौमत्व उरले आहे का? लोकसभेच्या सार्वभौमत्वाची जागा पंतप्रधानांच्या सार्वभौमत्वाने घेतली आहे. गेल्या काही वर्षात एकामागून एक घटनादुरुस्त्या मंजूर करण्यात आल्या, पण दिल्लीच्या सीमेवर 45 दिवस मरत असलेल्या पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी कायद्यात दुरुस्ती करायला सरकार तयार नाही.
कृषी कायदे मागे घ्या ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असेलही, पण त्यावर लोकसभेत चर्चा तरी होऊ द्या! सध्या काय सुरु आहे त्याची तुलना आणीबाणीशीच करता येईल, अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर हल्ला चढवला आहे.